इंग्लंड विरुद्ध भारत संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून (४ ऑगस्ट) सुरुवात झाली. ट्रेंट ब्रिज मैदानावर होत असलेल्या या सामन्याचा गुरुवारी(५ ऑगस्ट) दुसरा दिवस होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीरांनी अप्रतिम फलंदाजी करत पहिले सत्र भारताच्या नावे केले. लंचनंतर सुरु झालेल्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या एका तासात इंग्लंडने भारतीय संघाचे तीन प्रमुख फलंदाज बाद केले. यामध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला थेट फेकीवर धावबाद केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय संघाची घसरगुंडी
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा व केएल राहुल यांनी ९७ धावांची शानदार सुरुवात दिली होती. मात्र, पहिल्या सत्राच्या अखेरीस ओली रॉबिन्सनने रोहितला बाद करत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. पहिला गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडचा कर्णधार जो रूटने संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनला गोलंदाजी आक्रमणावर आणले.
भारतीय डावातील ४१ व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने चेतेश्वर पुजाराला झेलबाद केले. पुजाराने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. मात्र, तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर, कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला. मात्र, अँडरसनच्या अप्रतिम चेंडूवर तो फसला आणि त्याच्या बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू यष्टीरक्षक जोस बटलरने झेलला.
भारतीय संघाची दुर्दशा इतक्यावरच थांबली नाही. ४४ व्या षटकातील अँडरसनचा दुसरा चेंडू केएल राहुलने तटविला. नॉन स्ट्राइकला असलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेला ही धाव होईल असे वाटले म्हणून, तो जवळपास अर्ध्या खेळपट्टीवर धावला. मात्र, शॉर्ट मिड विकेटला उभ्या असलेल्या जॉनी बेअरस्टोने अचूक फेक करत रहाणेला धावबाद केले. एकवेळ बिनबाद ९७ अशा सुस्थितीत असणारा भारताचा डाव अचानकपणे ४ बाद ११२ असा घसरला.
A sensational hour of cricket after lunch ????
Scorecard/Clips: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/j7TvyxeSCE
— England Cricket (@englandcricket) August 5, 2021
पाऊस आणि खराब वातावरणामुळे खेळ थांबला
नॉटिंघममध्ये पावसाचे आगमन झाल्याने खेळ काही काळ थांबवण्यात आला. पावसाने उघडीप घेतल्यानंतरही खराब प्रकाशामुळे खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतरही थांबविण्यात आला आहे. अखेर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ४६.४ षटकात ४ बाद १२५ धावा बनविल्या आहेत. भारतासाठी केएल राहुल ५७ तर, रिषभ पंत ७ धावा काढून नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय फलंदाजांना नेहमीच सतावतो अँडरसन, ‘या’ दिग्गजांना दाखवलाय सर्वाधिक वेळा तंबूचा मार्ग
एक ‘गोल्डन डक’ अन् कर्णधार म्हणून विराटच्या नावे नकोसा विक्रम
भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेस ‘या’ कारणामुळे आहे सीएसके संघाचा चाहता





