भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पाचव्या दिवशी कमी सूर्यप्रकाशामुळे खेळ लवकर थांबवला गेला आणि भारताच्या हाततील विजय निसटला. न्यूझीलंडचे तळातील फलंदाज एजाज पटेल (२) आणि रचिन रवींद्र (१८) शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले आणि सामना अनिर्णीत केला. या सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा कर्णधार होता. सामना संपल्यानंतर त्याने खेळाडूंचे कौतुक केले. तसेच त्याने पंचांच्या सतत सूर्यप्रकाशाचा आढावा घेण्याविषयी देखील प्रतिक्रिया दिली.
सामना संपल्यानंतर रहाणे म्हणाला की, “हा क्रिकेटचा एक खूप चांगला सामना होता, ते खूप चांगले खेळले. पहिल्या सेशनमध्ये आम्ही खूप चांगले पुनरागमन केले. आम्ही शेवटचे पाच षटके टाकण्याचा प्रयत्न करत होतो. मला नाही वाटत की, आम्ही या यापेक्षा वेगळे काही करू शकत होतो.” रहाणेला विचारले गेले की, चौथ्या दिवशीचा शेवटचा सेशन तुम्ही लवकर संपवू शकत होता का, तर रहाणेने यावर स्पष्टपणे नाही, असे उत्तर दिले.
सोमवारी (२९ नोव्हेंबर) सामन्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या आर्ध्या तासात पंचांनी सूर्यप्रकाशाचा आढावा घेण्यासाठी लाइट मीटरचा वापर केला. रहाणे याबाबत बोलताना म्हणाला की, “पंचांसोबत सतत चर्चा सूर्यप्रकाशासंबंधीत होत होती. त्यांनी निर्णय घेतला आणि मला वाटते की, तो योग्य होता. मला वाटते की, या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मोठे स्पेल करायचे होते. हे गोलंदाजांना रोटेट करण्याशी संबंधीत होते.”
या सामन्यात भारतासाठी युवा श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पण केले. अय्यरने या सामन्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि सामनावीर ठरला. त्याने पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली. अय्यरने केलेल्या खेळीसाठी रहाणेने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला की, “मी श्रेयससाठी खूप आनंदी आहे. त्याला पदार्पणासाठी खूप मोठी वाट पाहावी लागली. तो ज्याप्रकारे फलंदाजी करत होता, त्याच्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट अप्रतिम राहिले आहे.”
कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करणार आहे. त्याच्यासाठी कोणता खेळाडू संघातील जागा मोकळी करेल, असा प्रश्न रहाणेला विचारला गेला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “विराट पुढच्या सामन्यात पुनरागम करणार आहे. व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनवर निर्णय घेईल.”
मालिकेतील दुसरा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर ३ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-न्यूझीलंड कसोटी ड्रॉ झाल्याने किवी कर्णधार खुश, ‘या’ खेळाडूंचे केले तोंडभरून कौतुक