आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वात उत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द २४ वर्ष इतकी लांबलचक होती. यादरम्यान तो अनेक दुखापतींना सामोरा गेला. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा पहिला भाग हा अप्रतिम होता. कारण तेव्हा तो दुखापत किंवा खराब कामगिरी अशा कारणाने क्वचितच संघाबाहेर राहिला. मात्र १९९९ पासून दुखापतींनी त्याला घेरले. १९९९ मध्ये पाठीचे दुखणे, २००१ मध्ये बोटाचे फ्रॅक्चर आणि त्यानंतर ‘टेनिस एल्बो’सारखी गंभीर दुखापत त्याला होऊन गेली.
याव्यतिरिक्त त्याला आणखी एक दुखापत झाली होती. ज्यामध्ये त्याच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते आणि स्वतः सचिनला याची तब्बल चार महिने कल्पना नव्हती. ही दुखापत पोचवणारा गोलंदाज होता पाकिस्तानचा तुफानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर.
सचिनने केला खुलासा
भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिलेल्या सचिनने एका ऑनलाइन शैक्षणिक संकेतस्थळावरील कार्यक्रमात बोलताना म्हटले, “सन २००७ मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. एका वनडे सामन्यात खेळताना पहिल्याच षटकात शोएब अख्तरचा एक चेंडू माझ्या बरगड्यावर येऊन लागला. हे खूप वेदनादायक होते. दोन महिने मी पोटावर झोपू शकत नव्हतो. अशा परिस्थितीत देखील मी खेळणे सुरू ठेवले. मी स्वतः माझे चेस्ट गार्ड डिझाईन केले. त्या मालिकेतील उर्वरित वनडे आणि कसोटी मालिका देखील मी खेळून काढली होती. त्यानंतर आम्ही बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो. २-१ अशा फरकाने कसोटी मालिका गमावल्यानंतर आम्ही तिरंगी मालिका देखील खेळली.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शोएब अख्तर आणि सचिन तेंडुलकर यांच्या दरम्यानचे द्वंद अनेकदा पाहायला मिळायचे. अख्तर त्यावेळी जगातील सर्वात वेगवान गोलंदाज तर, सचिन जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जात. सचिनने अख्तरला २००३ क्रिकेट विश्वचषकात मारलेला अपर कट कोणताही क्रिकेटप्रेमी विसरला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघातील ‘राजकारणा’स बळी पडत २००९मध्येच निवृत्ती घेणार होता आफ्रिदी, स्वत:च केला उलगडा