भारत विरुद्ध इंग्लंड या बलाढ्य संघामध्ये येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी मिळाली आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य सलामीवीर फलंदाज शुबमन गिल हा दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. अशात या सामन्यात गिलच्या जागी नवखा सलामीवीर अभिमन्यु ईश्वरन याला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसेल.
परंतु अधिकतर क्रिकेटप्रेमींना परिचित नसलेला ईश्वरन आहे तरी कोण?, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असावी. चला तर जाणून घेऊया, कोण आहे हा नवखा शिलेदार?
ईश्वरनचा जन्म उत्तराखंडची राजधानी देहरादून येथे झाला होता. तरीही हा २५ वर्षीय शिलेदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवणारा ईश्वरन उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज आहे. तो गरज पडल्यास कामचलाऊ गोलंदाजीही करु शकतो. २०१८-१९ या रणजी ट्रॉफी हंगामातील दमदार कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला होता.
अभिमन्यु ईश्वरनने ८६१ धावा चोपत पिटला आपल्या नावाचा डंका
ईश्वरनने २०१८-१९ या रणजी ट्रॉफी हंगामात झंझावती खेळी केल्या होत्या. अवघ्या ६ सामन्यात ८६१ धावा चोपत त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधले होते. याच कामगिरीमुळे त्याला २०१८ साली देवधर ट्रॉफीसाठी भारत अ संघाता जागा मिळाली होती. तसेच २०१९ मध्ये दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया रेड टीममध्ये त्याला सहभागी करण्यात आले होते. यावेळी दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने १५३ धावा करत त्याने संघाला एक डाव आणि ३८ धावांनी विजेतेपद जिंकवून दिले होते.
त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडेवारी वाखाणण्याजोगी आहे. ६४ प्रथम श्रेणी सामने खेळताना त्याने १३ शतकांच्या मदतीने ४४०१ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी ४३.५७ इतकी राहिली आहे. सोबतच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ६२ सामन्यात त्याने २८७५ धावा केल्या आहेत. तसेच २० ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात ४१७ धावांची नोंद केली आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर, क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात या खेळाडूवर विश्वास दाखवला जाऊ शकतो.
जर ईश्वरनला इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघात जागा मिळाली, तर तो नक्कीच आपल्या प्रदर्शनाची छाप सोडण्याचा प्रयत्न करेल.
असा आहे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
Standby players: Abhimanyu Easwaran, Prasidh Krishna, Avesh Khan, Arzan Nagwaswalla
Details ???? https://t.co/AZhTboIYOR
— BCCI (@BCCI) May 7, 2021
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
फॉर्मात असलेल्या पृथ्वीला भारतीय कसोटी संघात का मिळाली नाही संधी? प्रसिद्ध समालोचकाने सांगितले कारण
भारताबाहेर होणार आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन? इंग्लंडनंतर आता ‘या’ देशानेही दिली ऑफर