भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा एक नवीन प्रकार आढळला आहे. ज्यामुळे देशातील विविध क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या जात आहेत. अनेक युरोपीय देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. या प्रकरणी, भारत सरकारने अद्याप उड्डाणांबाबत कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही. मात्र, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याबाबत मोठे विधान केले आहे. भारतीय संघाला पुढील महिन्यात कसोटी, वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची चौथी लाट
दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गाची चौथी लाट आली आहे. या लाटेत विषाणूचे एक नवीन रूप आले असून, जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘ओमिक्रॉन’ असे नाव दिले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत कोणत्याही प्रकारची क्रीडा स्पर्धा होण्याची शक्यता मावळली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने तेथे होणारा ज्युनियर महिला विश्वचषक पुढे ढकलला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळली जाणारी वनडे मालिकाही पुढे ढकलण्यात आली.
काय म्हणाले ठाकूर
सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणारा भारतीय संघ ८-९ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. परंतु, ताज्या परिस्थितीमुळे ते संकटाला तोंड देत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) याबाबत निर्णय घेण्यासाठी काही काळ वाट पाहत आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकूर म्हणाले,
“केवळ बीसीसीआयच नाही तर, सर्व खेळ बोर्डांना आम्ही सांगू इच्छितो की, कोरोना प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये आपला संघ पाठवण्याआधी तुम्ही केंद्र सरकारची परवानगी घ्यायला हवी. किमान या संदर्भातील पूर्वकल्पना केंद्र सरकारला देणे आवश्यक आहे.”
सध्या भारताचा अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, दौऱ्यावरील पहिला सामना खेळला गेला आहे. आता उर्वरित दौरा पूर्ण होणार की खेळाडूंना मायदेशी बोलावले जाणार, याबाबत बीसीसीआय लवकरच आपला निर्णय कळवेल.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला धक्का! कोरोनामुळे ‘या’ संघाने अर्ध्यातच रद्द केली सुरू असलेली वनडे मालिका
शतकवीर अय्यरची तुलना होतेय ‘त्या’ कमनशिबी खेळाडूशी; ‘हे’ आहे कारण