दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट, ओमरिकॉन व्हेरिएंट सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याचे पडसाद क्रिडा क्षेत्रातही उमटताना दिसत आहेत. शनिवार रोजी (२७ नोव्हेंबर) क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड क्रिकेट बोर्डाने मिळून उभय संघांमध्ये सुरू असलेली ३ सामन्यांची वनडे मालिका अर्ध्यातच स्थगित केली आहे. कोविड-१९ महामारीचे संकट लक्षात घेता बोर्डांनी हा निर्णय घेतला आहे.
दुर्देवाची बाब अशी की, शुक्रवार रोजीच या मालिकेची सुरुवात झाली होती. शुक्रवारी मालिकेतील पहिला वनडे सामना अर्ध्यातच रद्द केल्यानंतर कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील २ सामने न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता भारताच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
या निर्णयानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे कार्यवाहक सीईओ फोलेत्सी मोसेकी म्हणाले की, आम्ही सध्या ज्या दुर्भाग्यपूर्ण स्थिती आहोत, त्याचे आम्हालाही खूप वाईट वाटते आहे. परंतु आमच्या देशाच्या दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक संघाची पुर्ण काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. क्रिकेटपटूंचे मानसिक स्वास्थ दक्षिण आफ्रिका क्रिकेटची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तसेच आम्ही आमच्या दर्शकांची स्थिती आणि त्यांच्या दृष्टीकोणाचाही सन्मान करतो. २०२३ मध्ये संपणाऱ्या आयसीसीच्या भविष्यातील क्रिकेट दौऱ्यांच्या या चक्रादरम्यान दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील उरलेली वनडे मालिका पुन्हा आयोजित केली जाईल.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर काय म्हणाले बीसीसीआय अधिकारी?
दुसरीकडे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला या दौऱ्यासंबंधी माहिती दिली आहे. ते अधिकारी म्हणाले की, “बीसीसीआय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी सतत संपर्क साधत आहे. परंतु आता खुद्द क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडविरुद्धची मालिका तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तर साहजिक आहे आमचीही चिंता वाढली आहे. बघूयात येत्या ३-४ दिवसांत स्थिती स्पष्ट होईल. त्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल.”
डिसेंबर २०२१ मध्ये जोहान्सबर्ग येथील पहिल्या कसोटी सामन्याने भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ४ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. २६ जानेवारी रोजी चौथ्या टी२० सामन्याने हा दौरा संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
शतकवीर अय्यरची तुलना होतेय ‘त्या’ कमनशिबी खेळाडूशी; ‘हे’ आहे कारण
आठवणीतील सामना: भारत विंडीजला हरवून बनला होता हीरो कप विजेता, कुंबळेने घेतलेल्या ६ विकेट्स