भारत देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात आकिब नबीच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर जम्मू-काश्मीर संघाने ४७७ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. या सामन्यात पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज आकिब नबीच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. कर्नाटकच्या पहिल्या डावात त्याने ५ बळी (विकेट्स) घेतले. २३ षटकांच्या गोलंदाजीत त्याने ५४ धावा देत ५ फलंदाजांना बाद केले. यामध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांसारख्या मोठ्या फलंदाजांच्या नावांचाही समावेश आहे.
केवळ अंतिम सामन्यातच नाही, तर संपूर्ण स्पर्धेत तो चमकदार कामगिरी करत आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात आतापर्यंत ६० बळी पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, त्याने उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) आणि उपांत्य (सेमीफायनल) सामन्यांतही ५-५ बळी घेण्याची किमया साधली होती. या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियामध्ये प्रवेश करण्यासाठी आपला प्रबळ दावा सादर केला आहे.






