भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा असा मालिका निर्णायक सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना जो मुंबईत झाला, त्यामध्ये भारताने 2 धावांनी रोमांचक विजय मिळवला होता. पुण्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने जबरदस्त कामगिरी करत 16 धावांनी सामना जिंकला होता आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत केली. या सामन्यात अर्शदीप सिंग याच्या वाईट कामगिरीमुळे त्याला तिसऱ्या सामन्यात खेळायला मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळू शकते हे पाहुया.
भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने दुसऱ्या टी20मध्ये 2 षटकात तब्बल 5 नो-बॉल टाकले होते. त्याने पहिल्या षटकातच नो-बॉलची हॅट्ट्रीक पूर्ण केली होती. या सामन्यात त्याने 37 धावा खर्च केल्या. यामुळे त्याला संपूर्ण 4 षटके टाकता आली नाही. अशात त्याला तिसऱ्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये जागा मिळण्याच्या संधी फारच कमी आहेत.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यानुसार राजकोटच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये कमी बदल होतील, कारण दुसऱ्या टी20मध्ये एकही खेळाडू जखमी झाला नाही. यामुळे भारतीय संघात फार बदल होणार नाहीत. तरीही अर्शदीपला नाही घेतले तर कोण त्याची जागा घेणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण पहिल्या सामन्यात हर्षल पटेल याचीही चांगलीच धुलाई केली होती. त्याने 4 षटकात 41 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या.
यामुळे हर्षललाही तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता नाही. भारताकडे मुकेश कुमार हा मध्यमगती गोलंदाज आहे. त्याला अनेक संघात निवडले गेले, मात्र अंतिम अकरामध्ये स्थान न मिळाल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण लांबले आहे. यामुळे उजव्या हाताच्या या गोलंदाजांला हार्दिक संधी देणार की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- ईशान किशन (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग/ मुकेश कुमार, युझवेंद्र चहल.
श्रीलंकेची संभाव्य प्लेईंग इलेव्हन- पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्षाना, कसून रजिथा, दिलशान मधुशंका.
तिसरा टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! सानिया मिर्झाचा अचानक निवृत्तीचा निर्णय, ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळणार कारकिर्दीचा शेवटचा सामना
ओडिशा एफसीला प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची संधी; ईस्ट बंगालशी सामना