आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयी चौकार ठोकून भारताला चॅम्पियन बनवणाऱ्या रिंकू सिंगला अंडरवर्ल्डकडून खंडणीची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिंकूकडून तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे क्रिकेटविश्वात आणि सुरक्षायंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ही धमकी थेट ‘D-Company’च्या नावाने देण्यात आली होती. रिंकू सिंगला फेब्रुवारी 2025 मध्ये पहिला संदेश मिळाला होता. या संदेशात स्वतःला ‘मोठा चाहता’ सांगत आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली होती. मात्र, या विनंतीला उत्तर न दिल्यामुळे, 9 एप्रिल रोजी आरोपीने पुन्हा एकदा थेट खंडणीची मागणी करत लिहिले “मला 5 कोटी रुपये हवेत. वेळ आणि ठिकाण मी ठरवीन. तुमची खात्री पाठवा.” तरीही रिंकू सिंगने प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर 20 एप्रिल रोजी “Reminder! D-Company” असा तिसरा मेसेज पाठवण्यात आला.
The Mumbai Crime Branch has revealed that D Company had demanded a ransom of ₹5 crore from Indian cricketer Rinku Singh, sending him three threatening messages between February and April 2025. Interpol had earlier helped arrest the accused Mohammad Dilshad and Mohammad Naveed… pic.twitter.com/kO3NJbKLDx
— IANS (@ians_india) October 8, 2025
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद अशी असून, हे दोघेही वेस्ट इंडिजमध्ये लपले होते. त्यांच्याविरुद्ध आधी लुकआउट नोटीस (LOC) आणि नंतर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजने त्यांना भारताच्या ताब्यात दिलं. नवीद हा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर 28 एप्रिल रोजी अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण तितकंच गंभीर आहे कारण या टोळीने केवळ रिंकू सिंगलाच नाही, तर काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यालाही 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं उघड झालं आहे. त्यालाही धमकीचे फोन येत होते. तपासादरम्यान आरोपीने हे दोन्ही प्रकरणं कबूल केली आहेत.
रिंकू सिंगने खेळाच्या मैदानात मिळवलेली लोकप्रियता त्याच्यासाठी धोक्याचं कारण ठरावी, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. खेळाडूंना अशा धमक्या मिळणं ही केवळ व्यक्तीगत सुरक्षा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेची बाब बनत चालली आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची गरज आता अधिक तीव्र झाली आहे.






