ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव दिवस-रात्र कसोटीमध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण झाला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच गडी गमावून २७६ धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मा १२ आणि तान्या भाटिया ० धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळही कमी प्रकाश आणि पावसामुळे लवकर बंद करण्यात आला. पहिल्या दिवशीही असेच घडले होते. पहिल्या दिवशी फक्त ४४.१ षटके खेळता आली. भारताने पहिल्या दिवशी एक गडी गमावून १३२ धावा केल्या होत्या.
पहिल्या दिवशी ८० धावांवर नाबाद राहिलेल्या स्मृती मंधानाने दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावले. तिने २१६ चेंडूत १२७ धावांची शानदार खेळी खेळली. आपल्या खेळी दरम्यान तिने २२ चौकार आणि एक षटकार ठोकला. तिच्या उत्कृष्ट खेळीमुळे या सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याशिवाय, ती पहिली महिला खेळाडू आहे, जिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र सामन्यात शतक झळकावले आहे. मंधाना व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी पूनम राऊतने ३६ धावा केल्या, तिने तब्बल १६५ चेंडू खेळून काढले, यादरम्यान तिने २ चौकार लागावले.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या मिताली राजने ३० धावा केल्या, ती धावबाद झाली. मितालीने ८६ चेंडूंचा सामना करत ५ चौकार लागावले. याशिवाय यास्तिका भाटियाने १९ धावांचे योगदान दिले. तिने तीन चौकार लागावले.
भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीस आल्यानंतर मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. शेफाली ६४ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ३१ धावांवर बाद झाली. तिला मोलिनेक्सने ताहिला मॅकग्राच्या हाती झेलबाद केले. २६ व्या षटकात शेफालीची विकेट पडली होती.
ऑस्ट्रेलिया संघाकडून तब्बल ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली, पण ते भारतीय महिला संघास सर्वबाद करण्यात अपयशी ठरले.
महत्त्वाच्या बातम्या –
उत्तर प्रदेश संघाच्या प्रशिक्षकपदी ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती, आयपीएलमधील प्रशिक्षणाचा आहे अनुभव
टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारे ५ फलंदाज, भारताच्या ‘रनमशीन’चाही समावेश
फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी






