टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श खूपच निराश दिसत होता. यावेळी बोलताना त्यानं टीम इंडियाला इशारा दिला आहे.
आता सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना भारताविरुद्ध होणार आहे. हा सामना सोमवार, 24 जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. जर ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्धचा सामना गमावला, तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. हे लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं सामन्यापूर्वी टीम इंडियाला इशारा दिलाय.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला, “कदाचित त्यांनी 20 धावा जास्त काढल्या. या स्पर्धेत अनेक संघांनी प्रथम गोलंदाजी केली आहे. आम्ही नाणेफेकीच्या वेळी जिंकण्याचा किंवा हरण्याचा विचार करत नाही. ही खेळपट्टी सोपी नव्हती. आता आम्हाला क्वालिफाय होण्यासाठी विजयाची गरज आहे आणि हे करण्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ नाही.”
सेंट व्हिन्सेंटच्या अर्नोस व्हॅले मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. संघासाठी रहमानउल्ला गुरबाजनं 49 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 127 धावांत गारद केला. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायबनं सर्वाधिक 4 बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियावर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका, अफगाणिस्तानकडे सेमीफायनलमध्ये धडक मारण्याची संधी!
अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचे पडद्यामागील हिरो! ‘या’ दोन दिग्गजांनी केला संघाचा कायापालट
अफगाण गोलंदाजांचा करिष्मा! ऑस्ट्रेलियाला हरवून असा रचला इतिहास; कांगारुंसाठी सेमीफायनलचं समीकरण बिघडलं