ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गड्यांनी लोळवले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या दिमाखदार गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. परिणामी भारताला एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवास अनेकांनी भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले. मात्र, माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी भारताच्या फलंदाजांची पाठराखण केली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी केली आपल्या नावे
ऍडलेड येथे संपलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला अवघ्या अडीच दिवसात पाणी पाजले. भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व जोस हेजलवूड यांनी भारताचा डाव अवघ्या ३६ धावांवर गुंडाळला. विजयासाठी मिळालेले ९० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ज्यो बर्न्सच्या अर्धशतकामुळे दोन गडी गमावत पूर्ण केले.
सुनील गावसकर यांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण
भारताच्या या दारुण पराभवानंतर भारताचे महानतम फलंदाज सुनील गावसकर यांनी भारताच्या फलंदाजांची पाठराखण केली. गावसकर यांनी म्हटले, “इतिहासातील निच्चांकी धावसंख्येवर बाद होणे, कधीही निराशाजनक असते. भारताच्या जागी दुसरा संघ या गोलंदाजी आक्रमणाचा सामना करत असता तर, त्यांचीदेखील अशी अवस्था झाली असती. ३६ नाहीतर ७०-८० धावांवर हे संघ बाद झालेच असते. स्टार्क, हेजलवूड व कमिन्स यांनी पहिला स्पेल ज्याप्रकारे टाकला, ते कौतुकास्पद होते. भारतीय फलंदाजांना लक्ष करणे चुकीचे आहे. ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी उत्कृष्ट होती.”
पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्स व जोस हेजलवुड यांच्या भेदक मार्यापुढे भारताचा डाव अवघ्या ३६ धावांवर संपुष्टात आला. दोघांनी अनुक्रमे ४ व ५ बळी आपल्या नावे केले. भारतीय संघ १९३३ पासून कसोटी क्रिकेट खेळत असतानाची हे सर्वांत निच्चांकी धावसंख्या आहे. या डावात भारताचा एकही फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकला नाही.
संबधित बातम्या
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अजब योगायोग! १९ डिसेंबर ठरली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील खास तारीख