भारतीय संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहली व इशान किशनने शानदार फलंदाजी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. पहिल्या टी२० सामन्यात भारताला इंग्लंडकडून निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली असून ३ सामने बाकी आहेत. असे असले तरी ही मालिका एका खेळाडूसाठी शेवटची टी२० मालिका ठरतेय की काय असे प्रश्न विचारले जात आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तीन कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध जे शानदार विजय मिळवले, त्यातील सर्वात महत्त्वाचे नाव होते अक्षर पटेल. अक्षरने पदार्पणाच्या कसोटी मालिकेत तीन सामन्यात तब्बल २७ बळी मिळवले. परंतू ऐकून आश्चर्य वाटेल की हाच अक्षर भारतीय टी२० संघातील स्थान टिकविण्यासाठी सध्या धडपड करताना दिसत आहे.
कसोटी मालिकेतील कामगिरीच्या आधारावर अक्षरला पहिल्याच टी२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. परंतू इंग्लंडविरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याने नाबाद ७ धावा केल्या तर गोलंदाजीत त्याला एकही विकेट घेता आली नाही. तब्बल दोन वर्षांनी तो टी२० सामना खेळताना दिसला. यापुर्वी फेब्रुवारी २०१८मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये टी२० सामना खेळला होता. त्या सामन्यातही त्याला एकही विकेट मिळाली नव्हती तर फलंदाजीत त्याने नाबाद एक धाव घेतली होती.
त्यापुर्वी अक्षर थेट नोव्हेंबर २०१७मध्ये राजकोट येथे न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामना खेळला होता. त्याही सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती व फलंदाजीत त्याने ५ धावा केल्या होत्या. टी२० कारकिर्दीत अक्षर पटेलने एकूण १२ सामने खेळले असून त्यात त्याला केवळ ९ फलंदाजांना बाद करण्यात यश मिळाले आहे. फलंदाजीतही त्याने ७५ धावा केल्या असून नाबाद २० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
भारतीय संघात फिरकीपटूबरोबर फलंदाजीत योगदान देणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर, क्रृणाल पंड्या, राहुल तेवतिया व रविंद्र जडेजासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. हे चारही खेळाडू आयपीएल तसेच देशांतर्गत टी२० मालिकेत शानदार कामगिरी करत आहेत. जडेजा व सुंदर तर भारतीय टी२० संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. याच कारणामुळे अक्षरची टी२० कारकिर्द संपते की काय असा प्रश्न विचारला जात आहे.
सध्या इंग्लंडविरुद्ध होत असलेल्या ५ सामन्यांच्या मालिकेतील ३ टी२० सामने बाकी आहेत. अशा वेळी कर्णधार विराट कोहली कसोटीतील आपल्या या हुकमी एक्क्यावर पुन्हा विश्वास ठेवतोय की नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल लिलावात पैसे जास्त मिळाले म्हणून चेंडू जास्त स्विंग होत नाही किंवा खेळपट्टीवर गवतही येत नाही
राजकारणापासून समाजसेवेपर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी