मुंबई । कोरोना विषाणूमुळे खेळाचे प्रचंड नुकसानही झाले आहे. भारतातील क्रिकेटवर वाईट परिणाम झाला आहे. देशातील कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतात क्रिकेट कधीपासून सुरू होईल हे सांगता येत नाही. कोरोनामुळे बीसीसीआयने तीन मोठ्या स्पर्धा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक तरुण खेळाडूंसाठी ही निराशाजनक बातमी आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने तीन मोठ्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळेच बीसीसीआयने दुलीप ट्रॉफी, देवधर करंडक आणि विजय हजारे ट्रॉफी आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण बीसीसीआयने रणजी करंडक योग्य वेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जानेवारी 2021 मध्ये रणजी करंडक होणार आहे. या वृत्तानुसार, बीसीसीआय रणजी करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी संपूर्ण ब्लू प्रिंट तयार करणार आहे, जेथे संघांना गटांमध्ये विभागले गेले आहे. यावेळी झोननुसार संघ आता आपापसात भिडतील. प्रत्येक झोनचा विजेता पुढील फेरीत प्रवेश करेल जी बाद फेरी ठरेल.
बीसीसीआयमधील अधिकार्याच्या मते, आयपीएलनंतर भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफीमधून सर्वाधिक पैसे कमवता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती योग्य राहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करणे आवश्यक आहे. आयपीएल व्यतिरिक्त क्रिकेटर्स इतर कोणत्याही घरगुती स्पर्धेत जास्त पैसे कमवू शकत नाहीत. त्यांना रणजी ट्रॉफीमध्ये पैसे मिळतात.
आयपीएलमध्ये 8 संघ तर 38 संघ रणजी ट्रॉफीमध्ये खेळतात. रणजी हंगामात, खेळाडू 10 ते 12 लाख रुपये कमावतात आणि काही संस्था प्रायोजकांचे पैसे देखील खेळाडूंमध्ये वितरीत करतात. बर्याच खेळाडूंसाठी हे जगण्याचे साधन आहे, म्हणून रणजी करंडक आयोजित करणे महत्वाचे आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या संघांनी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या संघांनी सराव सामने सुरू केले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू अजूनही घरीच आहेत आणि संघाचे प्रशिक्षण शिबिर कधी सुरू होईल हे कोणालाच माहिती नाही.