इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम काही दिवसांपूर्वीच संपला. असे असतानाच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढील आयपीएल हंगामाच्या तयारीला लागले आहे. नुकतेच आयपीएल २०२२ हंगामापासून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या २ संघांची घोषणा सोमवारी (२५ ऑक्टोबर) करण्यात आली आहे.
सोमवारी (२५ ऑक्टोबर) बीसीसीआयने दुबई येथे आगामी हंगामात सहभागी होणाऱ्या २ नव्या संघांच्या मालकी हक्कासाठी लिलावाची प्रकिया झाली आहे. या लिलावात आरपी संजीव गोयंका ग्रुप आणि इरेलिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स) या कपंन्यांनी बाजी मारत नव्या संघांचे मालकी हक्क खरेदी केले आहेत.
आरपी संजीव गोयंका ग्रुपने लखनऊ नवा संघ विकत घेतला आहे. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादचा संघ खरेदी केला. आरपी संजीव गोयंका ग्रुपने ७०९० कोटी रुपयांची बोली लावली. तर, सीव्हीसी कॅपिटलने ५६२५ कोटी रुपयांची बोली लावली. या लिलावात संघ विकत घेण्यासाठी २००० कोटी रुपये मुळ किंमत होती.
या लिलावात आडानी ग्रुप आणि मँचेस्टर युनायटेड यांची नावं सर्वाधिक चर्चेत होती, मात्र अखेर आरपी संजीव गोयंका ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी त्यांना टक्कर देत बोली जिंकली.
दोन्ही नव्या संघांचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ आणि आयपीएल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्वागत केले असून नव्या मालकांचे अभिनंदन केले आहे.
आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून दिसणार नवे संघ
बीसीसीआयने यापूर्वीच घोषणा केली होती की, आयपीएलच्या १५ व्या हंगामापासून स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच २ नव्या संघांच्या मालकी हक्कासाठी बीसीसीआयने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार सोमवारी (२५ ऑक्टोबर) नव्या संघांच्या मालकी हक्कासाठी लिलाव झाला.
आता पुढील हंगामात एकूण ७४ सामने खेळले जातील. प्रत्येक संघ ७ घरच्या मैदानात आणि ७ बाहेरच्या मैदानात सामने खेळले.
यापूर्वीही आयपीएलमध्ये खेळलेत १० संघ
गेल्या ७ वर्षापासून म्हणजेच २०१४ सालापासून आयपीएलमध्ये ८ संघच खेळताना दिसले आहे. पण, त्यापूर्वी आयपीएलच्या चौथ्या हंगामात म्हणजेच २०११ साली पहिल्यांदाच १० संघ पाहायला मिळाले होते. पुणे वॉरियर्स इंडिया आणि कोची टस्कर्स केरला हे दोन नवे संघ त्यावेळी सामील झाले होते. कोची टस्कर्स केरला संघाने ही एकमेव आयपीएल खेळत बाहेरचा रस्ता पकडला होता.
यानंतर २०१२ व २०१३ मध्ये पुण्याचा संघ धरून एकूण ९ संघ खेळत होते. २०१४ पासून पुन्हा स्पर्धा ८ संघांमध्ये झाली ज्यात पुणे वॉरियर्स इंडियाचा संघ बाहेर होता.
दरम्यान, २०१६ आणि २०१७ या दोन आयपीएल हंगामांसाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबन करण्यात आले होते. त्यावेळी या दोन हंगामांसाठी गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये आले होते. पण, चेन्नई आणि राजस्थान संघांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर गुजरात आणि सुपरजायंट्स संघांची आयपीएलमधून गच्छंती झाली.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, पुणे वॉरियर्स इंडिया, कोची टस्कर्स केरला, गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स हे संघ काही हंगामांसाठी आले आणि नंतर स्पर्धेतून गायब झाले.
सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे ८ संघ नियमित खेळताना दिसले आहेत. आता या संघांमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या २ नव्या संघांची भर पडणार आहे.
दोन बड्या शहरांचे प्रतिनिधित्व
आयपीएलमध्ये जे दोन नवे संघ प्रवेश करत आहेत, त्यातील एक संघ लखनऊ शहराचे, तर एक संघ अहमदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करणार आहे. या दोन्ही शहरात मोठ्या प्रमाणात क्रिकेटला लोकप्रियता आहे.
लखनऊ शहर भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची राजधानी आहे. या राज्याची लोकसंख्या १९ कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथे क्रिकेटचा एक मोठा चाहता वर्ग आहे. लखनऊ शहरात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम आहे, ज्याचे उद्धाटन २०१७ साली झाले आहे. याची क्षमता ५० हजार प्रेक्षकांच्या आसपास आहे. लखनऊ संघासाठी हे मैदान होम ग्राऊंड ठरू शकते.
दुसऱ्या बाजूला अहमदाबाद हा संघ मिळाला आहे. अहमदाबाद गुजरात राज्यात येत असून भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी लोकसंख्या या शहरात येते. या शहरात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून त्याचे नाव नरेंद्र मोदी असे आहे. त्याची क्षमता १ लाख ३२ हजार प्रेक्षकांची आहे. अहमदाबाद संघाचे सामने याच मैदानावर होऊ शकतात. या मैदानावरील सोयसुविधा अतिशय उच्च दर्जाच्या आहेत.