भारतीय संघाचा (team india) दिग्गज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मागच्या बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी करू शकलेला नाहीय. त्याच कारणास्तव त्याला काही दिवसांसाठी विश्रांती दिली गेली आहे. तो संघातून सध्या बाहेर आहे. त्याने भारतीय संघासोबत नोव्हेंबर २०२१ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेतही त्याला निवडले गेले नाहीय. अशात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हार्दिकच्या फिटनेसविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गांगुलींनी यावेळी हार्दिक रणजी ट्रॉफी खेळणार असल्याचे संकेत दिले.
बीसीसीआय अध्यक्षांना हार्दिकच्या फिटनेसविषयी जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले, त्यांना आशा आहे हार्दिक लवकरच गोलंदाजी करेल. गांगुली म्हणाले की, “हार्दिकला दुखापत झाली होती आणि त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी विश्रांती दिली गेली. जेणेकरून तो मोठ्या काळासाठी भारतीय क्रिकेटची सेवा करू शकेल. मला वाटते मी त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहील. मला आशा आहे की, तो जास्त षटके टाकेल आणि त्याचे शरीर मजबूत बनेल.”
आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी नवीन फ्रेंचायझी अहमदाबादने हार्दिकला संघात सामील केले आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवली. गांगुलींच्या मते अहमदाबादचे नेतृत्व करताना हार्दिक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्नात असेल. गांगुली पुढे बोलताना म्हणाले, “आता तर तो आयपीएलमध्ये अहमदाबादचा कर्णधार सुद्धा आहे आणि या प्लॅटफॉर्मवर निवडकर्ते त्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहतील. त्याच आधारावर ते निर्णय घेतील.”
दरम्यान हार्दिक २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याच्या अपेक्षित फॉर्ममध्ये एकदाही दिसला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे त्याची शस्त्रक्रियाही केली गेली, पण तरीही त्याच्या फॉर्ममध्ये अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसले नाही. आयपीएल २०२१ मध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यानंतर खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकातही त्याने गोलंदाजी केली नाही. त्यानंतर त्याला संघातून बाहेर केले गेले. दरम्यान, हार्दिकने स्वतःही घोषणा केली की, पुढच्या काही दिवसांसाठी संघात खेळण्यासाठी उपलब्ध नसेल.
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: जागतिक कॅन्सर दिनी ‘लढवय्या’ युवीने आठवले ते दिवस; आई म्हणतेय…
जरा इकडे पाहा! वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ कारनामा केलाय फक्त भारताच्या कर्णधार-उपकर्णधारांनी
कशी आहे रोहितच्या नेतृत्त्वाची शैली? भारताच्या ३१ वर्षीय गोलंदाजाने केला उलगडा