काही महिन्यांपूर्वी अशी चर्चा होती की इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामात म्हणजेच २०२२ हंगामात ८ ऐवजी १० संघ खेळू शकतात. मात्र, भारतात सध्या ओढावलेल्या कोरोना संकटाचा फटका आयपीएललाही बसत आहे. काहीदिवसांपूर्वीच आयपीएलचा १४ वा हंगाम २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. आता याच कारणामुळे बीसीसीआय नवीन आयपीएल संघांचे टेंडर जाहीर करणे, काहीकाळासाठी स्थगित करु शकतात.
सध्या बीसीसीआय आयपीएलचा १४ वा हंगाम पूर्ण करण्याबाबत चिंतीत असून नवीन संघाच्या समावेशाबद्दल चर्चा झालेली नसल्याचे एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितले आहे.
बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले, ‘या परिस्थितीत आयपीएलच्या नवीन संघाबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ नाही. आम्हाला पहिल्यांदा स्थगित करण्यात आलेला हंगाम पुढे कसा न्यायचा याचा विचार करायचा आहे. त्यानंतर आयपीएल २०२२मध्ये नवीन संघांच्या समावेशाबद्दल निर्णय घेतला जाईल. सध्यातरी याबद्दल कोणतीही चर्चा बीसीसीआयमध्ये नाही. जुलैच्याआधी याबद्दल काही होईल असे वाटत नाही.’
खरंतच मार्च महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयने आयपीएलच्या १५ व्या हंगामात २ नवीन संघाचा समावेश केला जाईल, असा इशारा दिला होता. तसेच या दोन्ही नवीन संघांबाबत आयपीएल २०२१ च्या अखेरी टेंडर जाहीर होईल, असेही समजले होते. पण सध्या त्यासर्व योजनांना थांबवावे लागले आहे. सध्या याबाबत काहीच निर्णय पुढे झालेला नाही.
एका सुत्राने सांगितले, ‘या क्षणी तरी आम्ही कोणतीही वेळ देऊ शकत नाही. मी, म्हटल्याप्रमाणे सध्यातरी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.’
बीसीसीआय समोर सध्या आयपीएलच्या १४ वा हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान आहे. कारण आता पुढील काही महिन्यांत जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय संघांचे वेळापत्रक बऱ्यापैकी व्यस्त आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींचा विचार करुन बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. तरी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले आहे की जर आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण झाला नाही तर जवळपास २५०० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
शतक हुकलं पण किर्तीमान केला, इंग्लिश कर्णधाराच्या जबराट कामगिरीने विराटसेनेची चिंता शिगेला!