यंदाचे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहे. यावर्षी टोकियोमध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिकचे आयोजन होणार आहे. त्यासाठी खेळाडूंची अंतिम तयारी सुरु झाली आहे. या स्पर्धेची अंतिम तयारी सुरु असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआय भारतीय ऑलिंपिक पथकासाठी तब्बल १० कोटी रुपयांचे योगदान देणार आहे.
रविवारी, ही बातमी समोर आली आहे. बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलची रविवारी व्हर्च्यूएल बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान १० कोटी रुपये टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय पथकासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआय या १० कोटींमधील २.५ कोटी रुपये खेळाडूंना त्यांच्या अंतिम तयारीसाठी देणार आहे. तर ७.५ कोटी रुपये टोकियो ऑलिंपिकच्या प्रचार मोहिमेसाठी देणार आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की ‘अपेक्स कौन्सिलची आज बैठक झाली. त्यात असे ठरले आहे की २.५ कोटी रुपये खेळाडूंच्या तयारीसाठी दिले जातील. तर ७.५ कोटी प्रचारासाठी होणाऱ्या उपक्रमांसाठी असतील.’
सध्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारे भारताचे अनेक खेळाडू जगभरातील विविध देशांत स्पर्धेची अंतिम तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांना निधी मंजूर करण्यात आले आहेत. ऑलिंपिकसाठी खेळाडूंना स्पर्धेच्या ५ दिवसांपूर्वी टोकियो येथे पोहचण्याची परवानगी आहे.
असे असले तरी सध्या इंडियन ऑलिंपिक असोसिएशनकडून जपान सरकारच्या नव्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण जपान सरकारच्या नव्या नियमानुसार भारतीय खेळाडूंनी स्पर्धेसाठी तिथे गेल्यानंतर पहिले ३ दिवस कोणाच्याही संपर्कात येऊ नये. पण या नियमाला इंडियन ऑलिंपिक असोसिएशनकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. कारण स्पर्धेच्या ५ दिवस अगोदर भारतीय खेळाडू आल्यानंतर ३ दिवस असेच वाया जातील.
या ऑलिंपिक स्पर्धेत भारताकडून पीव्ही सिंधू, निरज चोप्रा, बजरंग पुनिया, विनेश फोगट असे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
बीसीसीआय हे क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड समजले जाते. तसेच सध्या बीसीसीआयने भारतीय ऑलिंपिक पथकाच्या मदतीसाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत जेमिसनचा डंका, ‘या’ यादीत गाठले अव्वल स्थान
तब्बल १५ वर्षानंतर या देशात भारतीय महिला खेळणार कसोटी, क्रिकेट बोर्डाने दिली ‘या’ गोष्टीची शाश्वती
जेमिसनच्या ‘पंच’ने भारत घायाळ, किवी गोलंदाजाने नावे केला ‘हा’ विक्रम