श्रीलंका क्रिकेटने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) 2 ‘चॅरिटी’ सामने खेळण्याची विनंती केली होती. डिसेंबरमध्ये श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वह’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी हे टी-20 सामने खेळवले जाणार होते. मात्र, व्यावसायिक कारणांमुळे बीसीसीआयने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. तरीही, भारतीय संघाचा ऑगस्टमध्ये होणारा श्रीलंका दौरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडणार आहे. भारत या दौऱ्यात 2 कसोटी आणि 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी 27 आणि 29 डिसेंबर रोजी ‘दित्वह’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी 2 चॅरिटी सामने खेळवण्याबाबत चर्चा केली होती. परंतु, वेळेवर व्यावसायिक व्यवस्था आणि इतर गोष्टी पूर्ण होऊ शकल्या नाहीत. या भीषण चक्रीवादळामुळे श्रीलंकेचे सुमारे 1.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले असून 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
शम्मी सिल्वा यांनी स्पष्ट केले की, ऑगस्टमध्ये भारतीय संघाचा श्रीलंका दौरा ठरल्याप्रमाणेच होईल. या दौऱ्यात 2 कसोटी सामने खेळले जातील, जे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2025-27) स्पर्धेचा भाग असतील. या दौऱ्यापूर्वी भारताची कोणतीही कसोटी मालिका नाही. कसोटीसह येथे 2 आंतरराष्ट्रीय टी-20 सामनेही खेळवले जातील.
याव्यतिरिक्त, पुढील आठवड्यात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतून मिळणारे उत्पन्नही श्रीलंका क्रिकेट चक्रीवादळ मदत निधीसाठी दान करणार आहे. हे सामने दांबुला येथे खेळवले जातील.
7 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषक 2026 ला सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका (India and Shrilanka) या स्पर्धेचे संयुक्त यजमान आहेत. पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार असून, ‘ग्रुप बी’ मधील सर्व सामने श्रीलंकेत आयोजित केले जातील. जर पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये पोहोचला, तर अंतिम सामनाही कोलंबोमध्ये खेळवला जाईल. या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार असून त्यांची 5-5 च्या 4 गटात विभागणी करण्यात आली आहे.




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा