---Advertisement---

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर

On: रविवार, नोव्हेंबर 4, 2018 7:02 AM
---Advertisement---
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund)
राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने २००१ मध्ये ईडन गार्डनवर केलेला भीमपराक्रम आजही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजा आहे. सामन्याचा संपूर्ण चौथा दिवस या दोघांनी खेळून काढत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दमछाक केली.  हे दोघे जेव्हा आपली भागीदारी रचत होते तेव्हा त्यांना पाणी, नवे ग्लोव्हज, हेल्मेट या सगळ्या गोष्टी एकच खेळाडू नेऊन देत होता. एकदा तर द्रविडने त्याला सांगितले,

“तूही आना.और किसीको भेजना मत.”

याच सामन्यात त्याने पहिल्या डावात मॅथ्यू हेडनचा ९७ वर तर दुसऱ्या डावात स्टीव्ह वॉचा झेल घेत राखीव भारताच्या विजयाला हातभार लावला. या दोन झेलांपेक्षा ज्या दोन वीरांनी भारताला हा सामना जिंकून दिला त्यांना पाणी देण्याच्या कृतीने का होईना, आपला भारताच्या विजयाला हातभार लागला अशी त्या खेळाडूची भावना होती. तो खेळाडू होता हेमांग बदानी.
हेमांगचे वडील चेन्नईमध्ये क्लब क्रिकेट खेळत. त्यांच्या संघाच्या एका सामन्यात हेमांगने आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या संघासाठी फलंदाजी करत सामना अनिर्णित राखण्यास मदत केली. त्यावेळी त्याचे वय होते १२ वर्षे. या सामन्यात त्याने केलेली फलंदाजी पाहून त्याचे वडील कमल बदानी यांनी त्याला क्रिकेटकडे वळवण्याचे ठरवले. त्यांनी त्याची शाळा बदलून त्याला चेन्नईच्या त्यावेळच्या नावाजलेल्या सँथम हायस्कुलमध्ये घातले. याच शाळेत भारताकडून खेळलेले आशिष कपूर, थिरु कुमारन, सदगोपन रमेश हे खेळाडू हेमांगचे सिनियर होते. हेमांगने एक मध्यमगती गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मात्र उंची कमी असल्याने त्याच्या शाळेतील प्रशिक्षकांनी त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. शाळेकडून खेळताना कुचबिहार स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने १९९६-९७ च्या हंगामात हेमांगची निवड तामिळनाडूच्या रणजी संघात झाली.
रणजीच्या आपल्या पहिल्या हंगामात हेमांगने १ शतक आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ४७३ धावा करत ठसा उमटवला. प्रथम श्रेणी कारकिर्दीतला चौथा हंगाम (१९९९-२०००) हेमांगसाठी सर्वोत्तम हंगाम ठरला. या हंगामात हेमांगने १० सामन्यात २ शतके आणि ६ अर्धशतके काढत ७६२ धावा केल्या.  हंगामाच्या उपांत्य सामन्यात तामिळनाडूचा संघ मुंबईकडून पराभूत झाला. ह्या सामन्यात हेमांगने पहिल्या डावात १६२ तर दुसऱ्या डावात ६३ धावा केल्या. याच सामन्यात तेंडुलकरने पहिल्या डावात नाबाद २३३ धावांची खेळी करत मुंबईला केवळ ५ धावांची आघाडी मिळवून दिली होती. आजही सचिन हा सामना आपल्या रणजी कारकिर्दीतला सर्वात अविस्मरणीय सामना असल्याचे सांगतो. या हंगामातल्या आपल्या यशाचे श्रेय हेमांग ग्रेग चॅपेल यांना देतो. एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच आपण चांगली कामगिरी केली असे तो सांगतो.
अझर आणि अजय जडेजा या दोघांना २००० मध्ये झालेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय संघातील आपले स्थान गमवावे लागले. याचाच फायदा हेमांगला झाला. मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज आणि एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची भारतीय एकदिवसीय संघात निवड झाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात केलेले शतक बऱ्याच जणांना आठवत असेल. या सामन्यात ३ बाद ६० वर खेळायला येऊन हेमांगने भारताला २४८ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाकडून मार्क वॉने शतक करत त्यांना विजय मिळवून दिला. यावेळी हेमांगची फलंदाजीची सरासरी ५० च्या घरात होती. मात्र लवकरच हेमांगचा फॉर्म हरपला आणि अनियमित कामगिरीमुळे त्याची भारतीय संघातून हकालपट्टी झाली.

भारताकडून खेळलेल्या ४० एकदिवसीय सामन्यात हेमांगने ३३ धावांच्या सरासरीने ८६७ धावा काढल्या. तामिळनाडूचे खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करतात मात्र भारतीय संघातील आपले स्थान टिकवण्यासाठी ते त्यानंतर तेवढीच मेहनत घेत नाहीत. त्यामुळे भारताकडून प्रदीर्घ काळ खेळलेले तामिळ खेळाडू मोजकेच आहेत असे एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते.

एकदिवसीय संघात पदार्पण केल्यानंतर १ वर्षाने २००१ साली हेमांगने भारताच्या कसोटीसंघातही स्थान मिळवले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला डावाची सुरुवात करावी लागली. आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत त्याअगोदर एकदाही त्याने डावाची सुरुवात केली नव्हती. साहजिकच दडपण येऊन तो फक्त २ धावा करून बाद झाला. या कसोटीनंतरही ३ सामन्यांत त्याला संधी मिळाली परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. भारताकडून खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांत हेमांगने ९४ धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र तो भारताकडून कसोटीमध्ये खेळू शकला नाही.
भारतीय संघात स्थान नसले तरी हेमांग तामिळनाडूकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत राहिला.तामिळनाडूकडून १३ वर्षे  खेळल्यानंतर त्याने विदर्भाकडून काही वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळले. विदर्भाकडून २०१३ साली हेमांग आपला शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला. प्रथम श्रेणी कारकिर्दीत खेळलेल्या १२१ सामन्यांमध्ये त्याने ४५ धावांच्या सरासरीने ६५७८ धावा काढल्या. यात १५ शतके आणि ४५ अर्धशतकांचा समावेश होता.
या अगोदर २००७ मध्ये आपल्या वयाच्या ३० व्या वर्षी हेमांगने इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याअगोदर त्याने निवड समितीबरोबर चर्चा केली होती. आपण पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळू शकणार नाही असे सांगण्यात आल्यामुळेच आपण आयसीएल मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला असे वक्तव्य त्याने केले होते. एकदा आयसीएलमध्ये खेळण्याचा निर्णय झाल्यानंतर तामिळनाडू संघातली जागा अडवून ठेवण्यात अर्थ नाही म्हणून त्याने संघनिवडीकरता आपला विचार करू नये असे बोर्डाला कळवले होते. आयसीएलमध्ये तो चेन्नई सुपरस्टार्स संघाकडून खेळला. दोन वर्षांनी बीसीसीआयने आयसीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना पुन्हा एकदा देशांतर्गत स्पर्धांमध्ये पुनरागमनाची संधी दिली. या संधीचा फायदा घेऊन हेमांग पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला. याच दरम्यान सुरु झालेल्या आयपीलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघात त्याची निवडही झाली. मात्र त्याला एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. मे २०१४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

निवृत्तीनंतर लगेचच ऑक्टोबर २०१४ मध्ये त्याने दक्षिण विभागाच्या दुलीप करंडकाच्या संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. सध्या तो तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये तो चेपॉक सुपरगीलीज संघाचा प्रशिक्षक म्हूणन काम करतो.त्याच्या मार्गदर्शनाखाली या संघाने टीएनपीएलचे २०१७ चे विजेतेपदही मिळवले. गेल्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने अध्यक्षीय संघाविरुद्ध सराव सामना खेळला होता. त्या संघाचा प्रशिक्षक म्हणून हेमांगने काम केले होते. अलीकडेच स्टार स्पोर्ट्सने सुरु केलेल्या तामिळ वाहिनीवर आयपील तसेच भारताच्या सामान्यांचा समालोचक म्हणूनही हेमांग काम करत असतो. काही क्रिकेट वेबसाईट्ससाठी तो स्तंभलेखक म्हणूनही काम करतो.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता शोधून त्यांना पुढील स्तरावर जाण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे असे हेमांगचे मत आहे. यासाठी त्याने लक्ष्मीविलास बँकेला प्रायोजक म्हणून घेत तामिळनाडूमध्ये १४ वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या ६ जिल्ह्यांत मर्यादित असलेली ही स्पर्धा पुढे जाऊन संबंध राज्यभरातून गुणवंत खेळाडू निर्माण करण्याची त्याची मनिषा आहे.

या लेखावरील आपल्या प्रतिक्रीया आपण @Maha_Sports या ट्विटर हॅडलवर तसेच 9860265261 या वाॅट्सअॅप क्रमांकावर नोंदवु शकता. 
क्रिकेटवरील “भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील काही खास लेख-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १२- शापितांचा शापित

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ८ – आठवावा लागणारा निखिल चोप्रा

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!

-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर 

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment