-आदित्य गुंड ([email protected])
भारताकडून त्याचा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. हेल्मेटच्या आतमध्ये डोक्याला फडकं बांधून तो फलंदाजीला आला. त्याच्या हेल्मेटचं ते चकाकणारं ग्रील त्यावेळी भारीच वाटलं होतं. हा सामना म्हणजे त्याच्यासाठी “तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं.” असाच होता. ३ बाद १४२ वर तो खेळायला आला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार खेचत त्याने आपले इरादे स्पष्ट केले.
एकामागोमाग एक उत्कृष्ट फटके मारत त्याने ३८ चेंडूत आपले अर्धशतक साकारले. १९९९ साली आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अशी स्फोटक खेळी करणे म्हणजे चमत्कार करण्यासारखे होते. त्याने हा पराक्रम केला होता. ४५ चेंडूत ५७ धावा काढून तो बाद झाला. पॅव्हिलियनकडे परतत असताना त्याला “स्टँडिंग ओव्हेशन” मिळाले होते. आपल्या आक्रमक खेळीने त्याने अजय जडेजासारख्या स्टार खेळाडूचे शतकही झाकोळून टाकले होते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीची अशी स्वप्नवत सुरुवात कोणाला नको असते? अशीच सुरुवात त्याला मिळाली होती. तो खेळाडू होता अमेय खुरासिया.
भारतातर्फे एकदिवसीय पदार्पणात अर्धशतक काढणारा तो त्यावेळी आठवा खेळाडू होता. ह्या खेळीने तो अजित वाडेकर,नवज्योत सिध्दू, संदीप पाटील यांच्या पंक्तीत जाऊन बसला.
त्यानंतर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सलग दोन सामन्यांत मात्र खुरासिया ६ आणि ३ धावा काढून बाद झाला. या अपयशी कामगिरीनंतरही लगेचच शारजा मध्ये झालेल्या कोकाकोला कपसाठीदेखील त्याची संघात निवड झाली. तिथे संधी मिळालेल्या एका सामन्यात त्याने ५ धावा काढल्या.
या दोन तीन सामन्यांमध्ये स्वतःला तो सिद्ध करू शकला नाही तरी देखील श्रीलंकेविरुद्धच्या अर्धशतकी खेळीने खुरासियाने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. एक स्फोटक फलंदाज म्हणून उपयोगाचा ठरेल या निकषाखाली त्याची मे-जून १९९९ दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडकासाठी निवड झाली. मात्र विश्वकरंडकाचा सामना खेळणे खुरासियाच्या नशिबी नव्हते. एकही सामना न खेळता तो इंग्लंडवारी करून माघारी आला.
विश्वकरंडकानंतरही निवड समितीने त्याला दोन मालिकांमध्ये संधी दिली. पण खुरासियाला त्याचा फायदा उठवता आला नाही. उजव्या यष्टीबाहेरील चेंडूला छेडण्याची त्याची सवय एव्हाना गोलंदाजांना कळून चुकली होती.
२००१ मध्ये श्रीलंकेत झालेला कोकाकोला कप सुरु होण्याअगोदर सचिन दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आणि खुरासियाला पुन्हा एकदा संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याचे दडपण त्याला असावे म्हणून की काय याही वेळेस त्याला आपली छाप पाडता आली नाही. त्यानंतर मात्र तो कधी भारतासाठी खेळू शकला नाही.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो मध्यप्रदेश रणजी संघाचा नियमित सदस्य होता. प्रथम श्रेणीमध्ये त्याने बऱ्याचदा चांगली कामगिरी केली होती. आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत खेळलेल्या १९९ सामन्यांमध्ये त्याने २१ शतके काढत ७३०४ धावा केल्या. एकाच हंगामात ५०० हुन अधिक धावा काढण्याची कामगिरी त्याने एकदा नाही तर तीनदा केली होती. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या पर्वात २०००-०१ च्या हंगामात त्याने ७११ धावा काढून आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचे दाखवून दिले होते.
कालाय तस्मै नमः म्हणतात तसेच काहीसे होऊन अखेरीस मध्य प्रदेशच्या रणजी संघांतूनही त्याची गच्छंती झाली. रणजी संघातूनही वगळण्यात आल्याने काहीसे निराश होऊन अमेय २००७ मध्ये निवृत्त झाला. त्यानंतर त्याने प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम करणे पसंत केले. समालोचनासाठीसुद्धा त्याने दूरदर्शनसारख्या वाहिनीची निवड केली. स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन सारख्या वाहिन्यांवर इतर प्रसिद्ध समालोचक असताना त्याला तिथेही संधी मिळणे अवघडच गेले असावे. दूरदर्शनवरील समालोचक म्हणूनदेखील तो कोणाच्या लक्षात असेल असे वाटत नाही.
खुरासिया अभ्यासात फार हुशार होता म्हणतात. काही लोकांच्या मते तो भारतीय प्रशासकीय सेवेची (IAS) परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आपण क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊ असा विश्वास असल्याने त्याने IAS चा फार गंभीरपणे विचार केला नाही. अर्थात ही ऐकीव माहिती आहे.
खुरासियाकडे गुणवत्ता नक्कीच होती पण मिळालेल्या संधींचा फायदा त्याला उठवता आला नाही. गोलंदाजांनी आपले कच्चे दुवे ओळखल्यानंतर आपल्या खेळात हवे ते बदल त्याने कदाचित केले नाहीत. सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मध्यप्रदेश क्रिकेट अकादमीसाठी प्रशिक्षक म्हणून काम करतो. भारताचा भविष्यातील वेगवान गोलंदाज म्हणून बघितला जाणारा मध्य प्रदेशचा आवेश खान हा अमेयचा शिष्य आहे.
मनू अजमानी म्हणून माझा एक मित्र आहे. सध्या अमेरिकेत असतो. क्रिकेट हा आम्हा दोघांचा वीक पॉईंट. बऱ्याचदा तो तिकडे आणि मी इकडे मॅच बघत असतो. मॅच बघता बघता एकमेकांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवत असतो. कधीतरी रंगात येऊन भारतीय क्रिकेटचे जुने दिवस आठवले की अशा विस्मृतीत गेलेल्या खेळाडूंची नावे निघतात. त्या यादीमध्ये सुरवातीच्या काही नावांत खुरासियाचे नक्की असते.
अमेयची कारकीर्द
एकदिवसीय-
सामने- १२ धावा- १४९ शतके- ० अर्धशतके- १
प्रथम श्रेणी-
सामने- ११९ धावा- ७३०४ शतके- २१ अर्धशतके- ३१
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार या मालिकेतील अन्य लेख-
- भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १- पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर
-
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २- एक स्कॉलर खेळाडू
टीप- लेख वाचून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. अशाच विस्मृतीत गेलेल्या तुमच्या आठवणीतल्या काही खेळाडूंबद्दल वाचायची इच्छा असल्यास त्यांची नावे कॉमेंटमध्ये कळवा. त्यांच्याबद्दल लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.