एकीकडे भारतीय पुरूष संघ एकापाठोपाठ टी20 मालिका जिंकत चालला आहे. अशातच भारताच्या चिंता काही कमी होताना दिसत नाही. आधी अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे टी20विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)स्पर्धेला मुकला आहे. त्यातच भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2022मधून बाहेर पडला आहे.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)हा टी20 विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्याकडून अधिकृत माहिती यायची बाकी आहे.
बुमराहने दुखापतीनंतर नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यापूर्वीच तो पाठीच्या दुखापतीमुळे सामन्यात खेळला नाही. याबाबत बीसीसीआयने ट्वीटही केले होते.
https://twitter.com/BCCI/status/1575109843504930816?s=20&t=6g086IyRLpy6DbrqZgzhnA
बुमराहला पाठीच्या समस्येमुळे आशिया चषक 2022 या स्पर्धेसही मुकावे लागले होते. नंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे दोन टी20 सामने खेळले.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “बुमराह निश्चितपणे टी-20 विश्वचषक खेळणार नाही. त्याच्या पाठीची स्थिती गंभीर आहे. स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याने तो सहा महिन्यांसाठी संघाबाहेर राहू शकतो.”
भारताच्या टी20 विश्वचषकासाठीच्या राखीव खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी आणि दीपक चाहर आहेत, मात्र आता बुमराह न खेळण्याने त्यांची मुख्य संघात रवाणगी होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर 16 पासून ऑस्ट्रेलियात पुरूषांचा आठवा टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांसाठी नेहमीच पुरक ठरल्या आहेत. त्यातच भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज बाहेर झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुवनेश्वर कुमार याची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी काळजीचे कारण बनली आहे, तर बुहराहच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांच्यावर जबाबदारी असणार आहे.
रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा आधीच टी20 विश्वचषकास मुकला आहे. तो सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे.
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: नवीन चेंडूने अर्शदीपचा कहर, स्वत:च सांगितले भन्नाट गोलंदाजीचे रहस्य
भव्य फुटबॉल महोत्सवासाठी भारत सज्ज, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धा 11 ऑक्टोबरपासून
कॅप्टन रोहित शर्माची दिलदारी! सामना जिंकल्यानंतर पोहोचला थेट प्रेक्षकांकडे, एकाने तर हद्दच केली






