भारतीय क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या सुंदर खेळाने चाहत्यांवर प्रभाव पाडला, परंतु या अनेकांपैकी अगदी काही जणांची नावे मात्र कायम क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहीली. अशा खेळाडूंनीच हा खेळ महान बनविला. भारतीय क्रिकेटमध्ये खेळाच्या तंत्राला महत्त्व मिळवून देणारे, दिलीप नारायण सरदेसाई हे याच कायम लक्षात राहणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहेत. क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणार्या सरदेसाईंचा आज जन्मदिवस.
दिलीप सरदेसाई यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी गोवा येथील मडगाव येथे झाला. ते भारताचे प्रतिनिधित्व करणारे गोव्याचे एकमेव क्रिकेटपटू आहेत. त्यावेळी, गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य असल्याने शहरात क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी काहीच नव्हते. आदर्श घेण्यासारखे क्रिकेटपटू किंवा पायाभूत सुविधा सोडाच, त्या ठिकाणी साधी खेळपट्टी देखील नव्हती.
दिलीप हे सतराव्या वर्षी मुंबईत आले. तेथे ते विद्यापीठांच्या निवड चाचण्यांमध्ये भाग घेत. अशाच एका निवड चाचणीत सरदेसाई यांचे फलंदाजीतील कौशल्य पाहून त्यावेळचे मुख्य निवडकर्ता लाला अमरनाथ खुश झाले. ‘लक बाय टॅलेंट’ या पुस्तकात सुरेश मेनन यांनी लाला अमरनाथ व सरदेसाई यांचा संवाद नमूद केला आहे. लालाजी, सरदेसाई यांना म्हटले होते,
“मला तुमची फलंदाजी आवडली पण इतर निवडकर्त्यांना खेळाच्या तंत्राविषयी काही माहित नाही. म्हणून ,तुम्ही हवेमध्ये काही चेंडू मारा म्हणजे ते आनंदी होतील.”
सरदेसाई यांनी लालाजींच्या सूचनांचे पालन केले आणि त्यांची निवड झाली.
रणजी सामना खेळण्यापूर्वीच दिलीप सरदेसाई यांची भारतीय संघात निवड झाली होती. लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने पाकिस्तानविरुद्धच्या विद्यापीठाच्या सामन्यासाठी त्यांची निवड केली. तिथे त्यांनी ८७ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध अध्यक्षीय एकादशचे प्रतिनिधित्व करताना शतक झळकावले. त्यानंतर त्यांना त्यावेळच्या बॉम्बे संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. १९६१ मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी स्थानिक पातळीवर धावांचा रतीब घातला.
१७ वर्षांचा होण्यापूर्वी टर्फ विकेटवर न खेळणारा मुलगा २१व्या वर्षी भारताकडून खेळत होता. ही गोष्ट, त्यांच्या सर्वोच्च कौशल्याची आणि खेळाबद्दलच्या निष्ठेची साक्ष देते. दिलीप सरदेसाई फिरकी गोलंदाजांवर कायम वर्चस्व गाजवत. मायदेशात फिरकी गोलंदाज जास्त असल्याने हे घडले असले तरी, विदेशात देखील वेगवान गोलंदाजांचा ते नेटाने सामना करत.
१९६१ च्या वेस्टइंडीज दौऱ्यावर नरी कॉन्ट्रॅक्टर जखमी झाल्यानंतर सरदेसाई यांनी वेस्टइंडीजच्या आग ओकणाऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर सलामीचे फलंदाज म्हणून जाण्याचे धाडस दाखवले. त्याच सामन्यात, त्यांनी ३१ व ६० धावा काढल्या. १९७१ वेस्ट इंडीज दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सरदेसाई म्हटले होते,
” मी इथे धावा काढून आलोय आणि जातानाही स्वतःच्या नावावर धावा लावूनच जाणार.”
त्यांनी स्वतःलाच दिलेले हे आव्हान पूर्ण केले आणि इतिहास घडविला.
त्या मालिकेत, सुनील गावसकर यांनी सर्वाधिक ७७४ धावांची लूट केली व भारतीय क्रिकेटचे नवीन सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध झाले. पण, गावस्कर तेव्हा म्हणाले होते, ” दिलीप सरदेसाई यांनी वेगवान गोलंदाजी कशी खेळायची हे आम्हाला दाखवले आणि त्यांच्या सूचना ऐकल्याने, आम्हाला वेस्ट इंडिजला हरवायचा आत्मविश्वास मिळाला.”
दिलीप यांनीदेखील ६४२ धावा फटकावत ती मालिका संपविली. त्यांच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला पराजीत केले होते, तर त्यांच्या अमूल्य योगदानामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला मालिका विजय मिळविला.
सरदेसाई यांनी बॉम्बे संघासाठी ६१ रणजी सामने खेळताना ५४ च्या सरासरीने धावा जमविल्या. त्यांच्या नावे एक अनोखा विक्रम आहे. बॉम्बे संघासाठी त्यांनी खेळलेल्या एकाही सामन्यात बॉम्बे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही.
सरदेसाई यांनी १९७२ मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १७९ सामने खेळताना १०,००० हून अधिक धावा त्यांच्या नावासमोर लागल्या होत्या.
राहुल द्रविडने, दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चरमध्ये बोलताना म्हटले होते की, ” १९९१ मध्ये न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील १९ वर्षांखालील मुलांच्या सामन्यादरम्यान एका किवी खेळाडूने पंचांनी बाद दिल्यावर, तीव्र असंतोष व्यक्त केला होता. ही कृती सरदेसाईंना अजिबात आवडली नाही. ते त्या खेळाडू आणि न्युझीलंड संघ व्यवस्थापकाकडे गेले आणि तरूण खेळाडूंनी कसे वागले याविषयी त्यांना सुनावले.”
दिलीप यांचा मुलगा राजदीप सरदेसाई यांनीदेखील ७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्रतिनिधित्व देखील केले होते. राजदीप सरदेसाई लोकप्रिय भारतीय पत्रकार आहेत. ते सीएनएन-आयबीएन चॅनलचे मुख्य संपादकही होते. परंतु, सध्या ते इंडिया टुडे समूहात सल्लागार म्हणून काम करतात.
दिलीप सरदेसाई यांनी ३० कसोटी सामन्यांत ५ शतकांसह ३९.२३ च्या सरासरीने २,००१ धावा केल्या. पण, आकडेवारी नेहमी नाण्याची एक बाजू असते. दिलीप सरदेसाई यांचे भारतीय क्रिकेटमधील अमर्याद योगदान कोणत्याही संख्येपेक्षा खूप जास्त आहे.