नवी दिल्ली । भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १ जून १९८५ रोजी चेन्नईमध्ये झाला होता.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत भारताकडून त्याने आतापर्यंत २६ कसोटी, ९४ वनडे आणि ३२ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २५ च्या सरासरीने १०२५ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच वनडेत त्याने ३०.२० च्या सरासरीने १७५२ धावा केल्या आहेत. याव्यितिरिक्त टी२०त त्याने ३३.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या आहेत.
यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल यष्टीमागे अपयशी झाल्यानंतर कार्तिक भारतीय संघात आला होता. त्याने ५ सप्टेंबर २००४ला भारताकडून लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते.
आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने उत्कृष्ट पद्धतीने मायकल वॉनला (Michael Vaughan) एका हातानेच यष्टीचीत केले होते. पुढील २ महिन्यांनंतर म्हणजेच नोव्हेंबरमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. परंतु पहिल्या १० कसोटी सामन्यात त्याला केवळ एकच अर्धशतक करता आले होते.
त्याचा हा खराब फॉर्म ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीला (MS Dhoni) फायद्याचा ठरला. कारण धोनी बऱ्याच काळापासून भारतीय संघात पदार्पण करण्याची वाट पाहत होता. जसजसे धोनी भारतीय संघात आपले पाय रोवू लागला, तसतसे कार्तिकला संधी मिळणे कमी होत गेले. त्यामुळे संघात धोनीव्यतिरिक्त इतर यष्टीरक्षकाला स्थान मिळत नव्हते. असे असले तरीही कार्तिकने हार न मानता आपल्या फलंदाजीवर लक्ष देणे सुरुच ठेवले. तो अनेकवेळा भारतीय संघात बदली यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सामील होत राहिला.
जेव्हा धोनीने २०१४मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, त्यावेळी संघाने कार्तिकऐवजी वृद्धिमान साहाला पसंती दर्शविली. तरी कार्तिकला आयपीएलमध्ये चांगल्या किंमतीत फ्रंचायझींनी सामील केले होते. त्याने दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंंतर २०१८मध्ये त्याने केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली.
२०१८मधील निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय संघाला ५ धावांची आवश्यकता होती, तेव्हा कार्तिकने अप्रतिम षटकार ठोकत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या या शॉटसाठी तो नेहमी चाहत्यांच्या आठवणीत राहील. त्या सामन्यात कार्तिकने केवळ ८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या होत्या. तसेच त्या सामन्यात त्याने सामनावीराचा पुरस्कारही पटकावला होता.
त्याच्या क्रिकेट कारकीर्दीप्रमाणे त्याच्या वैयक्तिक जीवनातही बरेच चढ-उतार आले होते. कार्तिकने २००७ मध्ये निकिता वंजाराशी (Nikita Vanjara) लग्न केले होते. परंतु त्यानंतर त्याच्या पत्नीचे अफेअर भारतीय संघाचा सदस्य मुरली विजयबरोबर झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला, की घटस्फोट घेण्याची परिस्थिती उद्भवली होती. शेवटी निकिताने विजयसोबत लग्न केले.
त्यानंतर कार्तिकने २०१५मध्ये भारताची स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलबरोबर दुसरे लग्न केले. आज कार्तिक आणि दीपिका आपले विवाहित जीवन आनंदाने जगत आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेटमधील पुढील फॅब ४ होण्याची क्षमता असलेले ४ खेळाडू
-टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ५ भारतीय फलंदाज
-हे ‘३’ अंडर-१९ क्रिकेटर्स बनू शकतात भविष्यातील महान भारतीय खेळाडू