भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर चार सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यानंतर अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने पार पडणार आहेत. यातील २४ फेब्रुवारीपासून सुरु होणारा तिसरा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे.
अहमदाबादचे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. चेन्नईमध्ये होणाऱ्या सामन्यात स्टेडियमवर २५००० प्रेक्षकांना अनुमती दिली गेली होती तर अहमदाबादच्या स्टेडियमची क्षमता एक लाख दहा हजार इतकी असून त्यापैकी फक्त पन्नास टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे ५०००० पेक्षा जास्त चाहत्यांना या स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सध्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तिकीटविक्रीही सुरु झाली आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने सांगितले की इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यांच्या तिकिटांची विक्री रविवारी(१४ फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झाली आहे. या स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता एक लाख दहा हजार इतकी आहे जी जगातील कोणत्याही क्रिकेट स्टेडियमपेक्षा सर्वोच्च आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मांडलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार फक्त ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना खेळला जाईल.
या स्टेडियममध्ये इंग्लंड भारताविरुद्ध दोन कसोटी आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा गुलाबी चेंडूने खेळला जाईल. भारतातील हा केवळ दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. तर भारतीय संघाचा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.
भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता, ज्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याआधी भारताने बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन येथे पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता.
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नथवणी म्हणाले की, “इंग्लंडविरुद्धची ही मालिका आयोजित करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रेक्षकांना सामील करून घेण्यास आम्ही फार आतुर आहोत. आम्हाला आशा आहे की लवकरच सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊन स्टेडियमवर शंभर टक्के प्रेक्षक उपस्थित राहू शकतील.”
त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की, “अहमदाबाद येथे दोन कसोटी आणि पाच टी२० सामने आयोजित करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! ८९ कसोटीत विराट एकदाही झाला नाही यष्टीचीत; तर रोहित मात्र…
टी२० क्रमवारीत केएल राहुलला मोठा फायदा, पोहचला दुसऱ्या स्थानी; तर विराट कोहली ‘या’ क्रमांकावर
आर अश्विनने त्याच्या विक्रमी शतकाचं श्रेय दिलं टीम इंडियातील ‘या’ व्यक्तीला






