ढाका। शेरे बांगला स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विंडीजने बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केले. यामुळे विंडीजने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी खिशात घातली.
पहिल्या दोन्ही थरारक सामन्यानंतर या तिसऱ्या निर्णायक सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक होते. या सामन्यात विंडीजचा फलंदाज एविन लुईसने स्फोटक फलंदाजी करत 36 चेंडूत 89 धावा केल्या. मात्र हा सामना लुईसच्या फलंदाजीने नाही तर पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे.
विंडीजने प्रथम फंलदाजी करताना बांगलादेशसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने 3.5 षटकातच 54 धावा केल्या होत्या.
यामध्ये ओशेन थॉमसने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लिंटन दासने मिडऑफवर शॉट मारला. हा झेल क्षेत्ररक्षकाने पकडला असता पंच तनवीर अहमद यांनी त्याला नो बॉल असा निर्णय दिला. मात्र टीव्हीच्या फुटेजमध्ये तो निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात आले.
यामुळे विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने पंचांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच थॉमसच्या या षटकात पंचांनी दुसऱ्यांदा नो बॉल दिल्याने ब्रेथवेटने रिव्ह्यूची मागणी केली. मात्र पंचांनी ही मागणी फेटाळल्याने ब्रेथवेट चिडला. यावेळी त्याने पंचांशी वाद देखील घातला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन पण तेथे आला. यामुळे थर्ड अंपायर आणि मॅच रेफ्री यांना मध्यस्ती करावी लागली.
“नो बॉल निर्णय दिला तर रिव्ह्यू दिला पाहिजे. फक्त फलंदाज बाद झाला तरच रिव्ह्यू दिला जातो हे नियम बदलायला हवे”, असे ब्रेथवेट म्हणाला.
बांगलादेशच्या पक्षात हा निर्णय गेल्याने त्यांना फ्री हीट मिळाली. यावर सौम्य सरकारने षटकार मारला. तसेच या वादामुळे सामना 8 मिनिटे थांबवला गेला.
“मी येथे पंचांवर कोणतेही आरोप करत नसून त्यांनी बरोबर निर्णय द्यावे एवढेच माझे म्हणणे आहे”, असेही ब्रेथवेट म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
–ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेपुर्वी या खेळाडूच झालं शुभमंगल सावधान
–वनडेत संधी मिळाली नाही तर पुजारा-रहाणे या संघाकडून खेळणार तीन मालिका
–विजय- राहुलला डच्चू, हे दोन खेळाडू करणार टीम इंडियाची ओपनिंग ?