भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेची सुरुवात बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याने झाली. मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाला या सामन्यात रोहित शर्माच्या रूपात नवीन टी२० कर्णधार मिळाला आहे. रोहित शर्माने सामना संपल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली. भारताने या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला असला तरी, कर्णधार रोहित मात्र या विजयाने समाधानी झाल्याचे दिसत नाही. रोहितच्या मते हा विजय सोपा नव्हता.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही जेवढा विचार केला होता, हे तेवढे सोपे नव्हते. यातून खेळाडूंना शिकायला मिळाले की, काय केले पाहिजे आणि प्रत्येक वेळी हिटिंग करणे कामी येत नही. एका कर्णधारच्या रूपात मी आनंदी आहे की, आम्ही जिंकलो. काही खेळाडूंची कमतरता भासली, पण दुसऱ्या खेळाडूंना आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. गोलंदाजांचे कौतुक करावे लागेल, ज्यांनी न्यूझीलंडला १८० जवळ जाण्यापासून रोखले, जे एक वेळी शक्य वाटत होते.”
तर दुसरीकडे सामन्यात पराभव मिळालेल्या न्यूझीलंडचा कर्णधार टिम साउदी म्हणाला की, त्यांचे फलंदाज आवश्यक धावा करू शकले नाहीत. तो म्हणला, “चॅपमनने उत्कृष्ट फलंदाजी केली, पण आम्ही पुरेशा धावा करू शकलो नाही. गोलंदाजांनी सुरुवात अपेक्षित झाली नसली तरी पुनरागमन केले आणि सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेले ही सकारात्मक बाब आहे. मागच्या काही सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षणात आमचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे, ज्याची आज पुनरावृत्ती नाही करू शकलो. ”
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडसाठी सलामीवीर मार्टिन गप्टिल (७०) आणि मार्क चॅपमन (६३) या दोघांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघ २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा चांगल्या लयात दिसला. त्याने ३६ चेंडूत ४८ धावा केल्या, पण अर्धशतक झळकावण्यापासून तो वंचित राहिला. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवनेही ४० चेंडूत सर्वाधिक ६२ धावा केल्या. भारतीय संघाने १९.४ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला.