क्रिकेट… म्हटलं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे यासाठी खेळाडू लहानपणापासूनच स्वत:ला झोकून देत असतो. अनेकवेळा आपण अस ऐकलही असेल की खेळाकडे वळणारे अधिकतर खेळाडू शिक्षणात थोडे मागे असतात. याची काही उदाहरणेही भारतीय संघात आहेत. जसे की, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केवळ विद्यालयीनच शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ या खेळाडूंचेही असेच काहीसे आहे. विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. परंतु सर्वच भारतीय खेळाडू असे नाहीत. आज आपण या लेखात भारतीय संघातील त्या खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे खेळाबरोबरच अभ्यासातही अव्वल राहिले आहेत.
८. कृष्णमचारी श्रीकांत
आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असणारे कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) ८० ते ९० च्या काळात न अडखळता इंग्रजी बोलत होते, जेव्हा भारतीय संघामध्ये असे बोलणार फारसे कुणी नव्हते. निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीमध्येही महत्त्वाचे पद सांभाळणाऱ्या श्रीकांत यांनी चेन्नईच्या अन्ना विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली आहे.
श्रीकांत यांनी ४३ कसोटी सामने आणि १४६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत २०६२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्यांनी ४०९१ धावा केल्या आहेत.
७. अनिल कुंंबळे
भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) एक मॅकॅनिकल इंजीनिअर आहे. त्याने नॅशनल कॉलेज बसावनागुडीतून शिक्षण घेतल्यानंतर १९९२ मध्ये नॅशनल कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमधून मॅकॅनिकल इंजीनिअरची पदवी घेतली होती.
कुंबळेने भारताकडून एकूण १३२ कसोटी सामने आणि १७२ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत भारताकडून सर्वाधिक ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडे त्याने ३३७ विकेट्स घेतल्या आहेत.
६. जवागल श्रीनाथ
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा मॅच रेफरी जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांनीही इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियरिंग पूर्ण केले आहे. त्यांनी त्यांचे इंजिनियरिंगचे शिक्षण जेएसएस सायन्स अँड टेन्कोलॉजी युनिवर्सिटी, म्हैसूर येथून घेतले आहे.
त्यांनी भारतीय संघाकडून एकूण ६७ कसोटी सामने आणि २२९ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत २३६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्यांनी तब्बल ३१५ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीनाथ यांनी आपला पदार्पणाचा आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
५. आर अश्विन
भारतीय संघाचा गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपल्या फिरकी गोलंदाजीने जगातील अनेक मोठ- मोठ्या फलंदाजांना चिंतेत टाकले आहे. अश्विनने माहिती तंत्रज्ञान विषयात इंजिनीरिंग केले आहे. त्याने त्याचे शालेय शिक्षण पद्म सेशाद्री बाल भवन आणि सेंट बेडे अँग्लो इंडियन उच्च माध्यमिक शाळेतून घेतले आहे. त्यानंतर त्याने चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून इंजिनीयरिंग पूर्ण केले आहे. क्रिकेटपटू बनण्यापूर्वी तो कॉग्निझेंट टेक्नॉलॉजी सॉल्यूशन्ससारख्या मोठ्या आयटी कंपनीमध्ये काम करत होता.
त्याने भारतीय संघाकडून ७१ कसोटी सामने, १११ वनडे सामने आणि ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३६५ विकेट्स, वनडेत १५० विकेट्स आणि टी२०त ५२ विकेट्स घेतल्या आहेत.
४. राहुल द्रविड
भारतीय क्रिकेटची भिंत ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची (Rahul Dravid) भारतीय संघात जेव्हा निवड झाली, तेव्हा तो एमबीएचे शिक्षण घेत होता. यापूर्वी द्रविडचे विद्यालयीन शिक्षण बंगळुरूच्या प्रसिद्ध सेंट जोसेफ शाळेत झाले आहे. त्यानंतर त्याने कॉमर्समध्ये पदवी मिळविली.
द्रविडने भारतीय संघाकडून १६४ कसोटी सामने, ३४४ वनडे सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १३२८८ धावा, वनडेत १०८८९ धावा आणि टी२०त ३१ धावा केल्या आहेत.
३. व्हीव्हीएस लक्ष्मण
भारतीय संघाचा व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाज म्हणजेच व्हीव्हीएस लक्ष्मणचा (VVS Laxman) डॉक्टरांच्या कुटुंबात जन्म झाला आहे. त्याचे आई- वडील दोघेही डॉक्टर आहेत. ते दोघेही शिक्षणात खूप चांगले होते. लक्ष्मणने हैद्राबादच्या लिटल प्लावर हायस्कूलमधून विद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्याने क्रिकेटलाच आपले करिअर म्हणून निवडले. क्रिकेटमध्ये त्याने स्वत:ला झोकून दिले आणि तो व्यावसायिक क्रिकेटपटू बनला.
त्याने भारतीय संघाकडून १३४ कसोटी सामने आणि ८६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ८७८१ धावा आणि वनडेत २३३८ धावा केल्या आहेत.
२. अविष्कार साळवी
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा पुद्दुचेरी क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनलेला अविष्कार साळवी (Avishkar Salvi) खूप शिकलेला आहे. साळवीला भारतीय संघात अधिक संधी मिळाल्या नाहीत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राप्रमाणे ऍक्शन करणारा साळवी खगोलशास्त्रामध्ये पोस्ट डॉक्टरेट आहे.
त्याने भारतीय संघाकडून केवळ ४ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने केवळ ४ धावाच केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी करताना त्याने केवळ ४ विकेट्सच घेतल्या आहेत.
१. मुरली विजय
भारतीय संघाच्या शिकलेल्या क्रिकेटपटूंमध्ये आणखी एका खेळाडूचा समावेश आहे. तो खेळाडू म्हणजेच मुरली विजय (Murali Vijay). विजयने विद्यालयीन आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने एसआरएम या प्रसिद्ध विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविली. त्याने २००६ मध्ये क्रिकेट जगतात पाऊल ठेवले. त्यानंतर अवघ्या २ वर्षात त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले.
तेव्हापासून त्याने आतापर्यंत भारताकडून ६१ कसोटी सामने, १७ वनडे सामने आणि ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३९८२ धावा, वनडेत ३३९ आणि टी२०त १६९ धावा केल्या आहेत.