चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्च रोजी सामना खेळला जाऊ शकतो. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
एका वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भारत आणि पाकिस्तान सामन्याची तारीख आणि ठिकाण निश्चित केलं आहे. पीसीबीनं भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये आयोजित करण्याची योजना आखली आहे. मात्र, यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्च 2025 रोजी लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पीसीबीनं या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली आहे.
रिपोर्टनुसार, पीसीबी चेअरमन मोहसिन नक्वी टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यासाठी बार्बाडोसमध्ये होते. त्यांनी आयसीसीला 15 सामन्यांचं वेळापत्रक दिलं. टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. येथे कडक सुरक्षा व्यवस्था असणार आहे. लाहोरमध्ये 7 सामने खेळले जाणार आहेत. तर तीन सामने कराचीत होतील. यासोबतच रावळपिंडीत पाच सामने खेळले जाणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना कराचीमध्ये होऊ शकतो. यासोबतच तेथे उपांत्य फेरीचा एक सामना होऊ शकतो. रावळपिंडीत उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळला जाईल. तर अंतिम सामना लाहोरमध्ये होऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट तयार करण्यात आले आहेत. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांना ‘अ’ गटात ठेवण्यात आलं आहे. तर ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
झिम्बाब्वेविरुद्ध 8 वर्षांपासून हरलेला नाही भारत, टी20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड!
हा ‘कुंभकर्ण’ खेळाडू कोण? ज्याची झोपेमुळे चुकली टीम बस! भारताविरुद्धच्या सामन्यात बसावं लागलं बाहेर
तरुण वयात पडले मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात! खूपच रंजक आहे राहुल द्रविड यांची लव्ह स्टोरी