भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. 2022 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यानंतर सर्वप्रथम भारतीय संघाच्या निवड समितीला बरखास्त केले गेले. हा निर्णय अतिशय तडकाफडकी घेतला गेला होता. त्यानंतर जवळपास महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतरही नवीन निवडसमिती जाहीर झाली नाही. मात्र, लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नवी निवडसमिती जाहीर करू शकते. विशेष म्हणजे या समितीत मागील समितीचे सदस्य असलेल्या दोघांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
विश्वचषकातील पराभवानंतर सर्वात प्रथम निवड समितीला बरखास्त करण्यात आले. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समितीत हरविंदर सिंग, सुनील जोशी व देबशीष मोहंती यांचा समावेश होता. यानंतर बीसीसीआयने तातडीने नव्या निवड समितीसाठी अर्ज मागवले होते. मात्र, अद्याप नवीन निवडसमिती तयार झालेली नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसातच नवीन निवड समिती तयार होईल. विशेष म्हणजे या निवड समितीमध्ये मागील निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले चेतन शर्मा यांना देखील संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, त्यांना अध्यक्ष केले जाणार का याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच, कार्यकाळ संपण्यापूर्वीच हकालपट्टी झालेल्या अरविंदर सिंग यांना देखील दुसरी संधी मिळू शकते. विशेष म्हणजे या दोघांनीही पुन्हा एकदा आपले अर्ज दाखल केले आहेत. या दोघांनीही सध्या बनत असलेल्या संघाची पूर्ण प्रक्रिया पाहिली असल्याने त्यांना समाविष्ट करण्यास बीसीसीआय सकारात्मक आहे.
शर्मा हे निवड समितीत उत्तर विभागाचे तर, हरविंदर मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करतील. दक्षिण विभागातून माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. पूर्व विभागातून शिव सुंदर दास यांचे नाव निश्चित मानले जाते. तर, पश्चिम विभागातून सलील अंकोला व समीर दिघे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे.
(Chetan Sharma Likely Continue In New Selection Committee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॉकीचा वर्ल्डकप येतोय! जाणून घ्या भारताचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर
बीसीसीआयच्या निर्णयावर आयपीएल फ्रॅंचायजींचे प्रत्युत्तर! म्हणाले, ‘ते असे नाही म्हणू…’