विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. भारत आणि न्यूझीलंडच्या संघात १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे सगळया क्रिकेट विश्वाचे लक्ष आता या सामन्याकडे लागले आहे.
दरम्यान, न्यूझीलंडच्या संघाला या सामन्याच्या पूर्वतयारीसाठी सुवर्णसंधी मिळाली. या सामन्यापूर्वी नुकतीच त्यांनी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली, ज्यात १-० अशा फरकाने त्यांनी विजय मिळवला. आता या मालिकेचा फायदा न्यूझीलंडला होईल, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने देखील ही बाब मान्य केली. मात्र त्याचवेळी भारतीय संघ त्यांना कडवी लढत देईल, असेही वक्तव्य त्याने केले.
“भारतीय संघ प्रत्येक आव्हानासाठी तयार”
बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना पुजारा म्हणाला, “अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडच्या वातावरणात दोन कसोटी सामने खेळायला मिळाल्याने निश्चितच न्यूझीलंड संघाला फायदा मिळाला आहे. मात्र अंतिम सामन्यात आम्ही देखील आमचे सर्वोत्तम प्रयत्न करु. आम्हाला माहिती आहे की आमच्यात उत्तम प्रदर्शन करुन हे विजेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. त्यामुळे आम्ही याबाबत फार चिंतित नाही. आम्हाला जो सरावाचा वेळ मिळाला आहे, आम्ही त्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
“वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक”
यावेळी पुजाराने इंग्लंडमधील वातावरणाशी जुळवून घेणे, हे भारतीय खेळाडूंसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल हे स्पष्ट केले. तो म्हणाला, “इथे एकाच दिवसात वेगवेगळया परिस्थितीत खेळणे फलंदाजांसाठी आव्हानात्मक असेल. कारण अचानक पाऊस येतो तेव्हा खेळ थांबतो. आणि पाऊस थांबल्यावर लगेच हवामान स्वच्छ झाल्यावर तुम्हाला पुन्हा खेळ बदलावा लागतो. या गोष्टींशी आम्हाला जुळवून घ्यावे लागेल.”
यावेळी पुजाराने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणे, ही वैयक्तिकरित्या एक मोठी उपलब्धी असल्याचे विधान केले. त्यामुळे अंतिम सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचे ध्येय आहे, असेही तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
रेकॉर्डब्रेकर जिमी! वॅग्नरला बाद करताच मोडीत काढला मॅकग्राचा ‘तो’ विक्रम
केएल राहूल बॅक इन फॉर्म!! रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लगावला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल