भारतीय क्रिकेटला युवा खेळाडूंची खान आहे असे म्हटले जाते. यामागील कारणही तसेच आहे. कारण देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात तुम्हाला असंख्य क्रिकेटपटू मिळतील, ज्यांच्याकडे कौशल्य खूप आहे. परंतु त्यांना संघात स्थान मिळत नाही. अशातच आयपीएल, अंडर १९ आणि देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून हे क्रिकेटपटू जगासमोर येत असतात. असेच काही युवा क्रिकेटपटू आहेत, ज्यांना येणाऱ्या काळात भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात होते. परंतु त्यांना अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण देखील करता आलेले नाही.
१) उन्मुक्त चंद: उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर १९ संघाने २०१२ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने वयाच्या १७ व्या वर्षीच आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ६७ सामने खेळले आहेत. यात त्याला ३३७९ धावा करण्यात यश आले होते. तसेच १२० लिस्ट ए सामन्यात ४५०५ धावा केल्या आहेत.
देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने एकूण ७७ सामने खेळले आहेत. यात त्याला १५६५ धावा करण्यात यश आले आहे. त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जायचे. परंतु क्रिकेटमध्ये पाऊल ठेवून एक दशक होऊन देखील त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये.
२) दीपक हुड्डा : रोहतकच्या २६ वर्षीय दीपक हुड्डाने २०१३ मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून त्याने ४६ प्रथम श्रेणी सामन्यात २९०८, ६८ लिस्ट ए सामन्यात २०५९ धावा केल्या आहेत. यासोबतच १३१ टी-२० सामन्यात त्याने १८३४ धावा केल्या आहेत. बडोदा संघासाठी खेळणाऱ्या या खेळाडूने आयपीएल स्पर्धेत देखील उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु भारतीय संघ निवडकर्त्यांनी अजूनही त्याच्या कामगिरीची दाखल घेतलेली नाही. त्याला अजूनही राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाहीये.
३) सरफराज खान : देशांतर्गत स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २३ वर्षीय सरफराज खानने वयाच्या १६ व्या वर्षीच आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत एकूण १७ प्रथम श्रेणी सामन्यात ६६.५० च्या सरासरीने १४६३ धावा केल्या होत्या. यात त्याने तिहेरी शतक देखील झळकावले आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याची आयपीएल स्पर्धेत देखील निवड करण्यात आली होती. त्याने सुरुवातीला चांगली खेळी केली होती. परंतु त्याला अजूनही राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाहीये.
४) कमलेश नागरकोटी : कमलेश नागरकोटी याने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळताना २०१८ मध्ये झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच्या कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर त्याने, आतापर्यंत एकूण ९ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात त्याला ११ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर ११ टी-२० सामन्यात त्याला ५ गडी बाद करण्यात यश आले आहे.
तसेच आयपीएलमध्येही कोलकाता संघाकडून हा खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. क्रिकेट क्षेत्रात पाऊल ठेवून ३ वर्ष होऊन गेले तरी देखील त्याला अजूनही भारतीय संघात एन्ट्री करता नाहीये.
५) मंजोत कालरा : दिल्लीचा २२ वर्षीय युवा फलंदाज मनजोत कालरा अद्याप दिल्लीसाठी फारसा खेळलेला नाही. पण त्याची फलंदाजी आणि क्रिकेटींग क्लास पाहता सर्व क्रिकेट तज्ञ आणि क्रिकेट चाहत्यांनी आगामी काळात भारतीय क्रिकेटचे भविष्य असू शकेल असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु २०१९ मध्ये देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मंजोतला भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागु शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी क्रिकेटचा महामेरु सचिनचे झाले होते आयपीएल पदार्पण, ‘अशी’ राहिली त्याची कारकिर्द
जेव्हा जमली होती ‘मिस्टर ३६०’ आणि ‘रनमशीन’ची जोडी; ९६ चेंडूत २२९ धावा कुटत एकहाती जिंकला होता सामना