बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या २२व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( Commonwealth Games) महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदा महिला क्रिकेट तर दुसऱ्यांदा क्रिकेट खेळले जात आहेत. या स्पर्धेत ८ संघांचा समावेश असून सर्व साखळी सामने खेळून झाले आहेत. त्यातील चार संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. तर आता पदकासाठीचे सामने खेळले जाणार आहेत. भारत उपांत्य फेरीत पोहोचला असून त्यांचा सामना ज्या संघाशी होणार आहे, त्या संघाने भारताला टी२०मध्ये तब्बल १७ वेळा पराभूत केले आहे. यामुळे भारतीय संघाचा अंतिम फेरीत पोहण्याचा मार्ग सोपा नाही.
भारतीय संघ या स्पर्धेत हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. जर भारताला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर संघाला त्यांचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. मागील सामन्यात कशी कामगिरी केली हे विसरूनच भारताला मैदानात उतरावे लागणार आहे. या स्पर्धेतील क्रिकेटचे सामने पाहिले तर दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी उत्तम राहिली आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये रंगणार क्रिकेटची सेमीफायनल
या उपांत्य फेरीत भारताबरोबरच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ पोहोचले आहेत. भारताचा सामना यजमान संघ इंग्लंडशी होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हे दोन्ही सामने ६ ऑगस्टला एजबस्टन येथे खेळले जाणार आहेत. तसेच या स्पर्धेतील क्रिकेटचे सर्वच सामने एजबस्टन येथे खेळले जात आहेत.
भारताची इंग्लंड विरुद्ध टी२०मधील कामगिरी
भारताला इंग्लंडने टी२०मध्ये नेहमीच चांगली टक्कर दिली आहे. जर या दोन्ही संघांच्या सामन्यातील आकडेवारी पाहिली तर यावरून कळून येते की इंग्लंडचे पारडे जड आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघ टी२०मध्ये आतापर्यंत २२ वेळा आमनेसामने आली आहे. त्यातील १७ सामने इंग्लंडने तर भारताने ५ सामने जिंकले आहेत.
इंग्लंड घरच्या मैदानावर भारताविरोधात अव्वल
या सामन्यात भारताच्या विरोधातील आणखी एक मोठी बाब म्हणजे इंग्लंड घरच्या मैदानावर खेळत आहे. यामुळे घरच्या मैदानाचा इंग्लंडला फायदा होणार आहे. तसेच इंग्लंडने भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये ८ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील ६ सामने इंग्लंडने तर २ सामन्यात भारतीय महिलांनी विजय मिळवला आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय क्रिकेटला नवा इतिहास रचण्याची संधी
क्रिकेटच्या मैदानात रोज काही ना काही नवीन घडत असते. अशातच भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. झाले असे की, १९९८च्या स्पर्धेत भारताचा पुरूष संघ खेळला. मात्र त्यांना साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. या स्पर्धेत भारत अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळला. तर ही निराशाजनक कामगिरी विसरत भारताच्या महिलांना कॉमनवेल्थ गेम्समध्ये नवीन धडा लिहिण्याची संधी आहे. भारताने सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतील ४ पैकी ३ साखळी सामने जिंकले आहेत.
स्पर्धेतील खेळपट्टी कशी आहे
या स्पर्धेत ८ दिवसांत १६ सामने खेळायचे होते, म्हणून साखळी फेरींच्या सामन्यांसाठी हायब्रिड खेळपट्टी वापरली होती. त्या खेळपट्टीमध्ये नैसर्गिक गवत आणि आर्टीफिशियल धाग्यांचा वापर करण्यात आला आहे. तर आता पदकांच्या सामन्यांसाठी नेहमीची पारंपरिक नैसर्गिक खेळपट्टी वापरली जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आशिया कप आणि टी२० विश्वचषकांत कोण असेल कर्णधार रोहितचा जोडीदार?’, माजी दिग्गजाने स्पष्टचं सांगितलं
‘मला स्म्रीती किंवा हरमनप्रीत बनायचं नाही’, भारतीय खेळाडूची प्रतिक्रिया वेधतेय लक्ष
टी२० विश्वचषकात ‘हे’ ३ वेगवान गोलंदाज ठरणार हुकुमी एक्के, माजी प्रशिक्षकाची छातीठोक भविष्यवाणी






