---Advertisement---

टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ‘या’ दोन संघांना मिळतेय दिग्गजांची पसंती

---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धा आता काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) मंगळवारी (१७ ऑगस्ट) स्पर्धेच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. यादरम्यान अनेक दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेच्या विजेत्यांबाबत अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली आहे.

या दिग्गजांनी वर्तविले अंदाज
सध्या क्रिकेट समीक्षक असलेल्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आगामी विश्वचषकाबाबत अनेक अंदाज वर्तवले. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू गोलंदाज ब्रॅड हॉगने भारत आणि इंग्लंड संघांना ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले असून, दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज हर्शल गिब्सने देखील इंग्लंड, पाकिस्तान आणि भारत या ३ संघांना विजेतेपदासाठी संधी दिली आहे.

त्यासोबतच भारताचा अनुभव यष्टीरक्षक दिनेश कार्तिक व वेस्ट इंडीजला दोन वेळा टी२० विश्वविजेतेपद मिळवून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी यांनी देखील आपले अंदाज वर्तवले.

हा खेळाडू ठरू शकतो मालिकावीर
इंग्लंडची माजी महिला क्रिकेटपटू इशा गुहा हिच्यासोबत झालेल्या बातचीतमध्ये बोलताना सॅमी म्हणाला, “प्रबळ दावेदार असे कोणाचे छातीठोकपणे नाव सांगता येत नाही. वेस्ट इंडीज गतविजेता म्हणून स्पर्धेत सहभागी होईल. यावेळी देखील त्यांना विजयाची संधी आहे. टी२० मध्ये अष्टपैलू खेळाडूंना वाव असतो. मला आज मालिकावीर विचाराल तर मी आंद्रे रसेलचे नाव घेऊ शकतो.”

दिनेश कार्तिकने वर्तविला अंदाज
सदर प्रश्न भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक व समालोचक दिनेश कार्तिक याला विचारला असता तो म्हणाला, “मला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांना पाहायला आवडेल. भारतानंतर वेस्ट इंडीज माझा आवडता संघ आहे. माझ्या मते हेच दोन संघ आहेत जे ही स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहेत. ज्याप्रकारे टी२० प्रकारात वेस्ट इंडिजचा संघ खेळतो, यावरून हा त्यांचा आवडता क्रिकेटचा प्रकार आहे असे दिसून येते. हा विश्वचषक वेस्ट इंडीजचा संघ जिंकू देखील शकतो. मात्र, हे सर्व त्यांचा अंतिम सामन्यात विरोधी संघ कोण असेल यावर अवलंबून असेल.”

दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये समालोचक म्हणून काम करताना दिसत आहे. आगामी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात विश्वचषकासाठी पुनरागमन करण्याचे आव्हान त्याच्यापुढे आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. सुरुवातीला ही स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा आयसीसीने यूएईला हलविली. स्पर्धेची सुरुवात ओमान येथे पात्रता फेरीने होईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी

भारताच्या ऐतिहासिक विजयाचे ६ नायक, ज्यांनी गाजवली लॉर्ड्स कसोटी

“इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना घाबरले”, सचिन तेंडूलकरची यजमानांवर जहरी टीका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---