इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवडलेल्या भारतीय संघाकडे पाहून अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. खरे तर, १९ सदस्यीय संघात असे काही खेळाडू आहेत, ज्यांची निवड चाहते योग्य मानत नाहीत. टी२० मालिकेसाठी आवश्यक असलेले निकष हे खेळाडू पूर्ण करत नाहीत असा आरोप चाहत्यांनी केला. आज आपण त्याच तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊया, ज्यांच्या टी२० संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
१) नवदीप सैनी
ऑस्ट्रेलिया दौर्यामध्ये नवदीप सैनी फ्लॉप ठरला होता. त्याच्या चेंडूंचा ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगलाच समाचार घेतलेला. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतरही त्याला इंग्लंडविरुद्धच्या भारतीय टी२० संघात निवडले गेले आहे. त्यामुळे निवड समितीचा हा निर्णय चुकीचा असल्याचे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यामध्ये नवदीप सैनीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अत्यंत सरासरी गोलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत चाहत्यांना आशा होती की, आता त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखविला जाईलय परंतु असे झाले नाही. याच कारणाने काही चाहते त्याची निवड योग्य नसल्याचे सांगत, त्याच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित करीत आहेत.
२) अक्षर पटेल
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अक्षर पटेलला अचानक संधी देण्यात आली. त्यानंतर आता सर्वांना आश्चर्यचकित करून त्याला पुन्हा एकदा टी२० संघात निवडण्यात आले आहे. त्यामुळे अक्षर पटेल याच्या निवडीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाला अनेक सामने जिंकून देणाऱ्या कुलदीप यादव ला बाहेरचा रस्ता दाखवून अक्षर पटेलची संघात निवड केल्याबद्दल चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
३) रिषभ पंत
सध्या भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक बनलेल्या रिषभ पंत याच्या निवडीवरही अनेकांनी आक्षेप नोंदवला. पंत नजीकच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. मात्र, त्या कामगिरीच्या आधारे टी२० संघात निवड केली जाणे, अनेकांना रुचले नाही.
पंतची आयपीएल २०२० मधील कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी२० व वनडे संघात त्याला स्थान दिले गेले नव्हते. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मात्र त्याने आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर करत वाहवा मिळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टॉप-४ : असे खेळाडू ज्यांनी टीम इंडियाला जिंकून दिले सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने