इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी खूपच खराब गेला. मात्र, हंगामाचा शेवट त्यांनी चांगला केला. स्पर्धेतील ६९वा आणि त्यांचा १४वा सामना मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळला. शनिवारी (दि. २१ मे) पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे त्यांनी दिल्लीचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. मात्र, या सामन्यात विजय मिळवूनही मुंबई गुणतालिकेत तळाशीच राहिली. या लेखात आपण आयपीएलच्या प्रत्येक हंगामात तळाशी राहिलेल्या संघांबद्दल जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आयपीएल २०२२मध्ये १४ सामने खेळताना त्यातील फक्त ४ सामने जिंकले. दुसरीकडे, त्यांना १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने या हंगामात खेळताना सलग ८ सामन्यात पराभवाची चव चाखली होती. त्यानंतर त्यांनी २ सामने जिंकले. त्यानंतर त्यांना पराभव, विजय, पराभव आणि पुन्हा विजय असा चढ-उतार राहिला. ही त्यांची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी ठरलीये. ते गुणतालिकेत ८ गुणांसह दहाव्या स्थानी आहेत.
आयपीएल प्रत्येक हंगामात शेवटच्या स्थानी राहणारे संघ
आयपीएलमध्ये मुंबईपूर्वी अनेक बड्या संघांनाही गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहावे लागले आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८मध्ये डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) संघाला शेवटच्या स्थानी राहावे लागले होते. त्यानंतर २००९मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ तळाशी राहिलेला. २०१०मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings), २०११मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), २०१२मध्ये पुणे वॉरिअर्स इंडिया (Pune Warriers India), २०१३मध्ये दिल्ली कॅपिटल्स, २०१४मध्ये पुन्ही दिल्ली कॅपिटल्स, त्यानंतर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ २०१५ आणि २०१६मध्ये तळाशी राहिलेला.
याव्यतिरिक्त आयपीएल २०१७मध्ये रॉयल चॅलेजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore), २०१८मध्ये दिल्ली कॅपिटल्स, २०१९मध्ये पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०२०मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि २०२१मध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला तळाशी राहावे लागले होते. विशेष म्हणजे, दिल्ली चार वेळा, तर पंजाब ३ वेळा तळाशी राहिलीये.
सामन्याचा आढावा
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्लीने ७ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबईने १९.१ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केले.
आयपीएलच्या हंगामात तळाशी राहणाऱ्या संघांची यादी
२००८- डेक्कन चार्जर्स
२००९- कोलकाता नाईट रायडर्स
२०१०- पंजाब किंग्स
२०११- दिल्ली कॅपिटल्स
२०१२- पुणे वॉरिअर्स इंडिया
२०१३- दिल्ली कॅपिटल्स
२०१४- दिल्ली कॅपिटल्स
२०१५- पंजाब किंग्स
२०१६- पंजाब किंग्स
२०१७- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१८- दिल्ली कॅपिटल्स
२०१९- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०२०- राजस्थान रॉयल्स
२०२१- सनरायझर्स हैदराबाद
२०२२- मुंबई इंडियन्स*