शनिवारी (दि. २१ मे) मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२२च्या ६९व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने धूळ चारली. या पराभवामुळे दिल्ली संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नांना तडा बसला. तसेच, मुंबईच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला झाला. बेंगलोरने प्लेऑफमध्ये एंट्री केली. या सामन्यात मुंबईविरुद्ध पराभव मिळाल्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत म्हणाला की, त्याच्या संघाला आणखी चांगल्या रणनीतीची आणि ती व्यवस्थित हाताळण्याची गरज होती.
पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने ७ विकेट्स गमावत १५९ धावा चोपल्या होत्या. हे आव्हान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने ५ चेंडू शिल्लक ठेवत ५ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला फायदा झाला. त्यामुळे तो प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला.
दारुण पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचता न आल्याने रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला की, “सामन्यात अधिक काळ आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र, त्या स्थितीत पोहोचताच आमची पकड सुटली. संपूर्ण स्पर्धेत असेच होत आले. ही बाब कोणत्याही दबावाची नाही, तर रणनीती आणखी चांगली होणे आणि ती अंमलात आणण्याची आहे.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “संपूर्ण स्पर्धेत याची कमतरता भासली आहे. आम्ही आपल्या चुकांमधून शिकलो आहोत आणि पुढील वर्षी मजबूत संघाच्या रूपात परत येऊ.”
डीआरएस न घेण्यामागील कारण
मुंबई इंडियन्स संघाचा जबरदस्त फलंदाज टीम डेविड (Tim David) याचा झेल घेऊनही त्यावर डीआरएस न घेण्यामागील कारणही त्याने सांगितले. यावेळी तो म्हणाला की, “मला वाटले की, चेंडू बॅटला लागला आहे. मात्र, तिथे असणाऱ्या खेळाडूंना शंका होती. मी विचारले की, काय करायचे? आणि शेवटी मी रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.”
रिव्ह्यू न घेण्याचा निर्णयच दिल्ली संघाच्या अंगाशी आला. टीम डेविड शून्य धावेवर बाद होऊ शकला असता. मात्र, त्याला मोठे जीवदा मिळाले. त्यानेच पुढे १० चेंडू खेळत ३४ धावा चोपल्या आणि दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून रोखले. डेविडने जर फलंदाजीतून दिल्लीच्या स्वप्नांना तोडले असले, तरीही दुसरीकडे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानेही त्याला धिम्या खेळपट्टीवरही ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आणि रोवमन पॉवेल यांसारख्या खतरनाक फलंदाजांना तंबूत धाडले.
प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना २४ मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया