भारत आणि न्यूझीलंड संघा दरम्यान सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जातो आहे. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंना स्थान दिले. मात्र वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या वातावरणात दोन फिरकीपटूंना संघात स्थान दिल्याने भारतीय संघावर टीका होत होती. परंतु माजी खेळाडू दिलीप दोशी भारतीय संघाच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी दोन फिरकीपटूंना खेळवण्याची रणनीती योग्य असल्याचे भाष्य केले आहे.
‘या’ कारणासाठी अश्विन आणि जडेजा महत्वाचे
भारतीय संघाला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने पहिल्या डावात फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. मात्र भारतीय संघ या डावात अवघ्या २१७ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यामुळे साऊथम्पटनच्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवण्याचा भारतीय संघाचा निर्णय चुकला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
मात्र दिलीप दोशींनी या मताशी असहमती दर्शवली. त्यांच्या मते अंतिम सामन्यात अश्विन आणि जडेजा, हे दोघेही महत्वपूर्ण भूमिका बजावतील. ते म्हणाले, “भारताला या सामन्यात प्रत्येक धावेसाठी झगडावे लागेल. त्यामुळेच जडेजा आणि अश्विनची भूमिका त्यांच्यासाठी निर्णायक ठरेल. म्हणून या दोघांची निवड चुकली, असे मला अजिबात वाटत नाही.”
न्यूझीलंड गोलंदाजांचे केले कौतुक
यावेळी भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांत गुंडाळणाऱ्या न्यूझीलंड गोलंदाजांची देखील दोशी यांनी स्तुती केली. ते म्हणाले, “न्यूझीलंड गोलंदाजांसाठी हे वातावरण मायदेशातील वातावरणा सारखेच आहे. मात्र त्यांनी या वातावरणाचा फायदा उठवत अप्रतिम गोलंदाजी केली. भारतीय फलंदाजांवर त्यांनी सातत्याने दबाव टाकला.”
पावसामुळे खेळात व्यत्यय
दरम्यान, या अंतिम सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सततच्या पावसामुळे अद्यापही सुरू झाला नसून या सामन्याचे अजून दोन दिवस बाकी आहेत. भारतीय संघाच्या २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २ गडी गमावून १०१ धावा केल्या आहेत. केन विलियम्सन १२ धावांवर तर रॉस टेलर ० धावेवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: …म्हणून कसोटी क्रिकेट आहे सर्वोत्तम! किवी आणि भारतीय खेळाडूंनी सांगितली कारणे