मागच्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या कर्णधार बदलण्याची चर्चा केली जात आहे. भारतीय संघाला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात आतापर्यंत आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशात, भारतीय संघाचे माजी खेळाडू मदन लाल यांनी क्रिकेटमध्ये विभाजित कर्णधार असावा असे मत व्यक्त केले आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माला कर्णधार केले तर विराट कोहली वरचा दबाव कमी होईल, असे मदनलाल यांनी म्हटले आहे. आगामी टी20 विश्वचषक पार पडल्यानंतर विराटला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांच्या कर्णधार पदाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
मदनलाल यांनी संघासाठी दोन वेगवेगळ्या कर्णधार करण्याच्या विचाराचे समर्थन केले आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले, “हा एक चांगला पर्याय आहे. आपण सध्या चांगल्या स्थितीत आहोत. आपण भाग्यशाली आहोत की, आपल्याकडे रोहित आहे आणि जेव्हा कधी विराटला वाटेल की, त्याला एक किंवा दोन प्रकारांमध्ये लक्ष द्यायचे आहे, तर त्यावेळी रोहित येऊ शकतो आणि त्याच्याकडे खूप अनुभव आहे. मला वाटते की, यामुळे भारताला फायदा होईल.”
ते याबाबत पुढे बोलताना म्हणाले, “मी असे वाचले आहे की, कोहली शक्यतो एकदिवसीय आणि टी २० चे कर्णधारपद सोडेल, कारण तो त्याच्या फलंदाजीवर लक्ष देऊ इच्छित आहे, जी चांगली योजना आहे. मला नाही माहित ही अफवा आहे किंवा काय आहे, पण विभाजित कर्णधाराच्या योजनेचा भारताला फायदा होईल. विराट सध्या काय विचार करत आहे, यावर हे अवलंबून आहे. भारत एक संघाच्या रूपात चांगली कामगिरी करत आहे आणि हे आपण नुकतेच इंग्लंडमध्ये पाहिले आहे.”
दरम्यान, अलीकडच्या काळात भारतीय संघाचा कर्णधार बदलण्याबाबत अनेक बातम्या समोर आले आहेत. टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदांमध्ये बदल होईल अशीही माहिती समोर आली आहे. तरी, सध्यातरी बीसीसीआयचा कर्णधारबदलाचा विचार नसल्याचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भविष्यात नक्की काय निर्णय घेतला जाणार, हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
सनरायझर्स व्यवस्थापन चिंतेत, ‘या’ प्रमुख विदेशी खेळाडूला मिळेना व्हिसा
गेलचा बळी मिळवताच गोलंदाज बनला जिमनॅस्ट, भन्नाट सेलिब्रिशनचा व्हिडिओ व्हायरल