आजच्या दिवशी (३१ मे) भारतातील बंगाल राज्याची राजधानी अर्थात कोलकाता शहरात जन्मलेले एक क्रिकेटपटू, ज्यांना १९ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट सलामीवीरांमध्ये गणले जात असायचे, ते म्हणजे ‘पंकज रॉय’.
फेब्रुवारी ४, २००१ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर स्वत: सौरव गांगुलीने म्हटले होते की, “आधुनिक पिढी एमएस धोनी, राहुल द्रविड किंवा युवराज सिंग सारखा क्रिकेटपटू बनण्याची स्वप्ने पाहाते. परंतु जेव्हा आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती; तेव्हा आमच्या तोंडी फक्त ‘पंकज दा’ यांचे नाव असायचे.”
चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडला पहिल्यांदा चितपट करणारे धुरंधर
उजव्या हाताचे फलंदाज पंकज रॉय यांची क्रिकेट कारकिर्द जास्त मोठी राहिली नाही. परंतु आपल्या छोट्याशा कारकिर्दीत त्यांनी आपल्या प्रतिभेची छाप क्रिकेटजगतावर पाडली होती. चेन्नईच्या प्रसिद्ध चेपॉक स्टेडियमवर पहिल्यांदा भारताने इंग्लंडच्या चारीमुंड्या चीत करत एकहाती सामना जिंकला होता. पंकज रॉय त्या ऐतिहासिक सामना विजयाचे शिल्पकार ठरले होते.
६ ते १० फेब्रुवारीदरम्यान झालेल्या या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २६६ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात सलामीला फलंदाजी करताना पंकज रॉय यांनी १११ धावा चोपल्या होत्या. या खेळीदरम्यान त्यांनी १५ चौकार मारले होते. पंकज रॉय यांची विकेट पडल्यानंतर पॉली उम्रीगर यांनी डावाला चालना देत नाबाद १३० धावा केल्या होत्या. अखेर ९ विकेट्स गमावल्यानंतर ४५७ धावांवर भारताने पहिला डाव घोषित केला होता. या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या १८३ धावांवर इंग्लंड संघ गारद झाला होता. परिणामत: भारताने एका डावाची आघाडी घेत ८ धावांनी विजयी पताका झळकावली होती.
नर्वस नाइंटिजवर बाद होणारे पहिले भारतीय
एवढेच नव्हे तर, डावाची सुरुवात करताना दमदार फटकेबाजी करणारे हे भारतीय शिलेदार नर्वस नाइंटिजचे पहिले शिकार बनले होते. डिसेंबर १९५९ मध्ये दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात फक्त एका धावेने त्यांचे शतक हुकले होते. अशाप्रकारे कसोटीत ९९ धावांवर बाद होणारे पंकज रॉय हे पहिले भारतीय फलंदाज ठरले होते.
अशी राहिली क्रिकेट कारकिर्द
देशांतर्गत क्रिकेटमधील बंगाल संघाचे प्रतिनिधित्त्व करताना पंकज रॉय यांनी १८५ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यादरम्यान ४२.३८ च्या सरासरीने ११८६८ धावा केल्या होत्या. नाबाद २०२ धावा ही त्यांची प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी राहिली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी ४३ कसोटी सामने खेळले होते. यादरम्यान १७३ धावांच्या सर्वोच्च खेळीसह २४४२ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघासाठी तयार केलेल्या जाळ्यात इंग्लंड संघही अडकू शकतो, दिग्गजाने दिला इशारा
आयपीएल २०२१ साठी ‘या’ मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार बदल? बीसीसीआय करत आहेत चर्चा