भारताचा माजी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन मनमीत सिंग वालियाचा कॅनडाच्या मांट्रियल येथे सोमवारी (११ मे) निधन झाले. त्यांना मागील २ वर्षांपासून एएलएस (Amyotrophic Lateral Sclerosis) हा आजार होता. ते ५८ वर्षांचे होते.
त्यांच्या परिवारात पत्नी आणि २ मुली आहेत. वालिया आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी कोईमतूरलाही गेले होते.
मनमीत (Manmeet Singh Walia) १९८० च्या दशकात सर्वात उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक होते. तसेच १९८९मध्ये हैद्राबादमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात एस श्रीराम यांना पराभूत करत राष्ट्रीय चॅम्पियन बनले होते. ते १९८१पासून सलग ४ राष्ट्रीय चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहोचले. परंतु त्यांना विजय मिळवता आला नाही.
आशियाई चॅम्पियनशीप १९८०मध्ये ८ व्या राष्ट्रीय चॅम्पियन कमलेश मेहताबरोबर (Kamlesh Mehta) भारतासाठी पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक आतरंराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यावेळी भारतीय संघात मनमीत आणि कमलेश व्यतिरिक्त मनजीत सिंग दुआ, बी अरूण कुमार आणि व्ही. चंद्रशेखर यांचा समावेश होता.
भारतीय संघाला उत्तर कोरियाविरुद्ध ४-२ने आघाडी घेऊनही ४-५ने पराभव स्विकारावा लागला होता. मनमीतबरोबरच्या त्या आठवणींना उजाळा देत कमलेश म्हणाले की, मनमीत त्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता.
कमलेश पुढे म्हणाले की, “मी आणि मनमीतने कोलकातामध्ये आशियाई चॅम्पियनशीपदरम्यान एकत्र पदार्पण केले होते. उत्तर कोरियाविरुद्ध मनमीत, चंद्रा आणि अरूणला खेळण्याची संधी मिळाली होती. मनमीतने आपल्या दोन्हीही सामन्यात विजय मिळवून भारताला आघाडी घेण्यास योगदान दिले होते. भारत या चॅम्पियनशीपमध्ये ५व्या क्रमांकावर राहिला होता.”
तसेच भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव एमपी सिंग यांनी मनमीत यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हटले की, हे संपूर्ण टेबल टेनिस जगतासाठी दु:खद क्षण आहे.
“जेव्हा मी खेळत होतो, तेव्हा एक खेळाडू म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली होती. तसेच काही वर्षांपूर्वी ते जेव्हा दिल्ली येथे आले होते, तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. मी एक चांगला मित्र गमावला आहे,” असेही एमपी पुढे म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-युवराजचा टीम इंडियातील मोठ्या व्यक्तीवर निशाना, मला नाही वाटतं तो टी२० प्लेअर घडवु शकतो
-कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक