जागतिक क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची तुलना काही युवा स्टार खेळाडूंशी केली जाते. अनेक दिग्गज खेळाडूंनी जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे. आता काही युवा खेळाडूंची खेळण्याची शैली देखील दिग्गज खेळाडूंसारखी आहे, त्यामुळे वारंवार अशा चर्चा होत असतात. याआधी सचिन तेंडुलकरची तुलना ब्रायन लारा, रिकी पान्टिंग आणि इंझमाम उल हक यांच्याशी झाली होती. आता विराट कोहलीची तुलना स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि बाबर आझम यांच्याशी केली जात आहे.
तत्पूर्वी पाकिस्तानच्या झहीर अब्बासने (Zaheer Abbas) बाबर आणि कोहली यांच्यातील तुलना फेटाळून लावली असून तो मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. ही तुलना पूर्णपणे निरर्थक असल्याचे पाकिस्तानच्या या अनुभवी फलंदाजाचे मत आहे. अब्बास म्हणाला, “या निरूपयोगी चर्चा आहेत. विराट कोहली प्रत्येक सामन्यात धावा करतो आणि बाबर कोणत्याही सामन्यात धावा करत नाही. तुम्ही तुलना कशी करू शकता? जो धावा करतो तो मोठा खेळाडू असतो.”
कसोटी क्रिकेट सर्वोच्च असल्याचे वर्णन करताना अब्बास म्हणाला, “कसोटी क्रिकेट हे खरे क्रिकेट आहे आणि खेळाडूच्या कौशल्याचीही खरी कसोटी आहे. एक काळ असा होता की, भारत-पाकिस्तानमध्ये चांगले कसोटी संघ होते. क्रिकेटशिवाय कसोटी चालू शकत नाही. हे आता सर्वच मंडळांच्या लक्षात आले आहे. तुम्ही किती टी20 खेळू शकता किंवा किती मर्यादित षटकांच्या स्पर्धा खेळू शकता? शेवटी एकदिवसीय किंवा कसोटी सामने खेळावे लागतील.”
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर 80, तर बाबरच्या नावावर 31 शतके आहेत. भारतीय संघाचे कौतुक करताना अब्बास म्हणाला की, “भारत विविध फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत असून चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ शानदार आहे. त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट खेळत आहेत. हा अतिशय उत्कृष्ट संघ असून विचारपूर्वक खेळतो. त्यांच्याकडे एक चांगला कर्णधार आहे, जो क्रिकेटला चांगला समजतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला स्वत:चा अभिमान’, 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याने जडेजाची प्रतिक्रिया
कोहली की रूट? न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!
कोहली आणि पंतमध्ये पुन्हा वाद! धाव काढताना गोंधळ उडाल्याने थोडक्यात बचावला विराट, मग…