ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाब्बा स्टेडियमबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. 2032 च्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक संपल्यानंतर ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंडचे गाबा स्टेडियम पाडले जाईल. गाबा हे अनेक वर्षांपासून क्रिकेट आणि एएफएल (ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग) चे प्रमुख केंद्र आहे. आतापर्यंत या मैदानावर अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. आता क्वीन्सलँड सरकारने घोषणा केली आहे की गाबा स्टेडियमची जागा ब्रिस्बेनच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये सुमारे 63000 प्रेक्षकांची क्षमता असलेले एक नवीन, अत्याधुनिक स्टेडियम घेईल. हे नवीन स्टेडियम भविष्यात मोठ्या स्पर्धांचे आयोजन देखील करेल.
The Gabba will be demolished after the 2032 Olympics.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 25, 2025
– The new 60,000 seater stadium will be built for the Olympics. pic.twitter.com/aIoXmnIzFN
गेल्या काही वर्षांत, गाबाला त्याच्या जुन्या पायाभूत सुविधा आणि मर्यादित सुविधांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. हे तेच मैदान आहे जिथे 2021च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने 1988 नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्या सामन्यात भारतासाठी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. या मैदानाला ऑस्ट्रेलियाचा किल्ला म्हणतात, येथे कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियाला हरवणे खूप कठीण होते. या मैदानावर आतापर्यंत अनेक ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत, परंतु आधुनिक गरजा लक्षात घेता, आता ते कोणत्याही सामन्याचे आयोजन करण्यासाठी योग्य मानले जात नाही. अशा परिस्थितीत, सरकारने ते काढून टाकून एक नवीन स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे क्वीन्सलँडच्या क्रीडा समुदायाला एक चांगली आणि आधुनिक सुविधा मिळेल.
नवीन स्टेडियमची अंदाजे किंमत सुमारे 3.8 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स असेल आणि ते क्रिकेट, एएफएल आणि इतर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यासाठी डिझाइन केले जाईल असे वृत्त आहे. नवीन स्टेडियम बांधल्यानंतर आयसीसी स्पर्धा आणि बिग बॅश लीग सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यास सक्षम असेल, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड क्रिकेटने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
पूर्वी, गाबाच्या पुनर्बांधणीसाठी 2.7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्च करायचे होते, परंतु वाढत्या खर्चामुळे आणि विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली. आता, सरकारने निर्णय घेतला आहे की गाबाची देखभाल करणे कठीण झाले आहे, म्हणून ते पाडले जाईल आणि एक नवीन आधुनिक स्टेडियम बांधले जाईल. गाबा स्टेडियमचे भविष्य बऱ्याच काळापासून अनिश्चित आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की इंग्लंडविरुद्धच्या आगामी अॅशेस मालिकेपर्यंत गाब्बा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करेल, त्यानंतर ते बंद होईल.
गाबा 1931 पासून कसोटी क्रिकेटचे आयोजन करत आहे. याठिकाणी अनेक ऐतिहासिक सामने झाले आहेत. या मैदानावर पहिला कसोटी सामना 1931 मध्ये खेळवण्यात आला होता आणि आतापर्यंत येथे 67 पुरुष क्रिकेट सामने खेळले गेले आहेत, तसेच महिला संघाने दोन कसोटी सामने खेळले आहेत. भारताने बीजीटी दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला. मालिकेतील ही तिसरी कसोटी होती जी अनिर्णित राहिली.