बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली( sourav ganguly) हे मागील काही काळापासुन वादात अडकले आहेत. एका बाजूला विराट कोहलीसोबत त्यांचे संबंध चांगले दिसत नाहीत. तर, दुसरीकडे त्यांच्यावर संघ निवडीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर गांगुलींनी मौन व्रत सोडले आहे. मी अफवांना उत्तर देत नाही आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणून माझे काम करतो असे त्यांंनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांची उत्तरे दिली आहेत. त्यांनी म्हंटल आहे की, “मला कोणत्याही प्रकारच्या आधारहीन आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही. मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे त्यामुळे जे काही काम माझ्यावर सोपवलं जात तेच मी करतो. सोशल मिडीयावर एक फोटो व्हायरल होतोय त्यामध्ये असे सांगितले जात आहे की, मी निवड समितीच्या बैठकांमध्ये उपस्थित आहे. मला असे सांगायचे आहे की तो निवड समितीचा बैठकीचा फोटो नाही. त्या फोटोमध्ये माझ्याशिवाय विराट कोहली, जय शहा, संयुक्त सचिव जयेश जाॅर्ज सुद्धा आहेत. जॉर्ज व जय शहा निवड समितीचे सदस्य नाहीत.”
जय शहांसोबतच्या नात्याबद्दल गांगुली म्हणाले..
“तो माझा मित्र आहे आणि माझे त्याच्याशी चांगले संबंध आहेत. आम्ही एकमेकांचे सहकारी आहोत. मी, जय, अरुण धुमल आणि जयेश जॉर्ज आम्ही सगळे मिळून कोरोनाच्या काळात कठोर परिश्रम करत बोर्डाला पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही सगळे मिळून हे सुनिश्चित करत आहोत की, क्रिकेट कोणत्याही परिस्थितीत खेळली जावी. आम्ही सोबत मिळून काम केले आहे आणि मागील दोन वर्षे आमच्यासाठी शानदार होती.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआय आता नवीन कसोटी कर्णधाराच्या शोधात आहे. अनेक खेळाडूंची नावे कर्णधार पदासाठी सुचवली जात आहेत. कर्णधारपदासाठी काही मापदंड असतात, असे त्यांनी म्हटले आहे. “यामध्ये जो फिट बसेल तो कसोटी संघाचा पुढचा कर्णधार होईल. निवड समितीच्या सदस्यांच्या मनात काही नावे असतील. याबद्दल अध्यक्ष व सचिवांशी चर्चा करून येणाऱ्या काळात घोषणा करणार आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-