भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेंडू बदलण्याच्या मुद्द्यावर मैदानातील अंपायरशी वाद घालताना दिसला. अंपायरनी जो नवा चेंडू देऊन भारतीय संघाला दिला, त्यावर कर्णधार शुबमन गिलसह अनेक खेळाडू समाधानी नव्हते. यामुळे गिलने याबद्दल अंपायरकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर गिल आणि अंपायरमध्ये अनेक वेळा मैदानावर वाद होताना दिसला. यामुळे आता भारतीय कर्णधारावर आयसीसी (ICC) मोठी कारवाई करू शकते.
गोलंदाजी दरम्यान 91व्या षटकात कर्णधार शुबमन गिलने गोलंदाजांसह चर्चा करून खराब झालेला चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंपायरने चेंडू बदलला देखील, परंतु त्या नव्या चेंडूवरही गिल फारसा समाधानी नव्हता. गिलने अंपायर सोबत चेंडूबद्दल बोलायचा प्रयत्न केला, पण अंपायरने ऐकण्यास नकार दिला. त्यामुळे गिल खूपच नाराज झाला आणि त्याने थेट अंपायर सोबत वाद घालायला सुरुवात केली. या वेळी मोहम्मद सिराजही (Mohmmed Siraj) समाधानी दिसत नव्हता, परंतु त्याला दुर्लक्षित करत अंपायरने सामना सुरु करण्याचा इशारा दिला. आता आयसीसी भारतीय कर्णधार शुबमन गिलवर कारवाई करू शकते.
कर्णधार शुबमन गिलचे हे वर्तन आयसीसीच्या नियम 2.8 चे उल्लंघन ठरू शकते. हा नियम अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यावर लागू होतो. या नियमानुसार अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवणे आणि वाद घालणे हे शिक्षेस पात्र गुन्हा मानले जाते. त्यामुळे गिलवर कारवाई होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकीपर रिषभ पंतनेही अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयसीसीने पंतवर कारवाई करत त्याला 1 डिमेरिट पॉइंट दिला होता.






