आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी चेन्नईसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. तो सहसा सामन्याच्या शेवटच्या 1-2 षटकांमध्ये फलंदाजीला येतोय. रविवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात धोनी 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आता त्याच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यानं टीका केली आहे.
‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “जर धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर त्यानं खेळायलाच नाही पाहिजे. त्याच्या जागी एखाद्या वेगवान गोलंदाजाचा समावेश करणं संघासाठी फायद्याचं ठरेल. संघामध्ये सर्व निर्णय तो घेतो. मात्र त्यानं लवकर फलंदाजीला न येऊन टीमला निराश केलं आहे.”
हरभजन सिंग पुढे म्हणाला, “पंजाबविरुद्ध शार्दुल ठाकूर धोनीच्या आधी फलंदाजीला आला. तो कधीही धोनीप्रमाणे षटकार मारू शकत नाही. मला हे समजत नाहीये की, धोनीनं ही चुकी का केली. त्याच्या मर्जीशिवाय संघात काहीच होत नाही, आणि मी हे मान्य करायला तयार नाही की, त्यानं 9व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय दुसऱ्या कोणी घेतला असेल.”
यानंतर बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्जला जेव्हाही वेगानं धावा करण्याची आवश्यकता होती, तेव्हा प्रत्येक वेळी धोनीनं असं केलं आहे. मात्र पंजाब किंग्ज विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तो इतक्या उशीरा फलंदाजीला आला. जरी चेन्नई जिंकली असली, तरी मी धोनीला टीममध्ये घेतलं नसतं. लोकं काहीही म्हणो, मात्र मी जे योग्य आहे तेच बोलणार आहे.”
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी 19व्या षटकात फलंदाजीला आला. मात्र या सामन्यात धोनी काहीची करू शकला नाही. हर्षल पटेलनं त्याला पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केलं. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जचा 28 धावांनी पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
एमएस धोनीला ‘बोल्ड’ केल्यानंतर चाहत्यांचा राग अनावर! सोशल मीडियावर हर्षल पटेल द्वेषाचा बळी
42 वर्षीय धोनीनं सर्वांना टाकलं मागे, बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक