इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम नुकताच संपला आहे आणि गुजरात टायटन्स यावर्षीचा विजेता संघ बनला आहे. या हंगामात नेहमीप्रमाणे काही युवा खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली, तर काही दिग्गज अपयशी ठरले. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अगरवाल देखील या सामन्यात त्याच्या प्रतिभेनुसार प्रदर्शन करू शकला नाही. मयंकच्या खराब प्रदर्शानविषयी बोलताना माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने खास प्रतिक्रिया दिली.
कर्णधार मयंक अगरवाल (Mayank Agarwal) ज्या पद्धतीने खराब प्रदर्शन करत होता, त्याच पद्धतीने त्याचा संघ पंजाब किंग्जला देखील चांगले प्रदर्शन करता आले नाही. प्लेऑफमध्ये पंजाबला स्थान मिळाले नाही. मयंकच्या निराशाजनक प्रदर्शनाविषयी हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, तो मयंकच्या या खराब फॉर्ममुळे खूप निराश आहे. हरभजनच्या मते कर्णधारपदाच्या दबावामुळे मयंक चांगले प्रदर्शन करू शकला नाही.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, “जर आपण मयंक अगरवालविषयी बोललो, तर मी मनात विचार केला की, त्याला काय झाले आहे? तो एवढा चांगला खेळाडू आहे. मला वाटते की कर्णधारपद मिळाल्यापासून त्याच्यावर दबाव आला आहे. सलामीवीरापासून तो थेट चौथ्या क्रमांकावर खेळू लागला. या हंगामात मयंक मोकळेपणाने खेळू शकला नाही. त्याला मोकळीक मिळाली पाहिजे होती. जर ती मिळाली असती, तर तो निश्चितच चांगले प्रदर्शन करू शकला असता.”