ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात उद्या (18 जानेवारी) तिसरा वन-डे सामना होणार आहे. हा सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिखर धवनने भारताला पाचव्या गोलंदाजाची उणीव भासत असल्याचे म्हटले आहे.
“हार्दिक पंड्या संघात असला तर भारताला पाचवा गोलंदाज मिळतो. तसेच फलंदाजीतही मदत होते. मात्र तो संघात नसल्याने संघाचा समतोल हवा तसा होत नाही आहे”, असे धवन म्हणाला.
खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे सामन्यात गोलंदाजी केली होती. पण या दोघांनीही भरपूर धावा दिल्याने भारताला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला होता.
खलीलने सिडनी वन-डे सामन्यात 8 षटके गोलंदाजी करताना 55 धावा दिल्या होत्या. तर सिराजने 10 षटकात 76 धावा दिल्या होत्या. यावेळी दोघांनाही विकेट घेण्यात अपयश आले. पहिला वन-डे सामना भारताने 34 धावांनी गमावला होता.
“ते दोघे नवीन असून ऑस्ट्रेलिया सारख्या संघाविरुद्ध खेळणे अवघड आहे. ते दोघे उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे म्हणत धवनने खलील आणि सिराज यांचा बचाव केला आहे.
“संघाने दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ केला. त्यातच धोनीने अप्रतिम फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला”, असेही धवन म्हणाला.
धवन पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात 28 चेंडूत 32 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना
–टीम इंडिया विरुद्धच्या निर्णायक वनडेसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ
–भारतात परतल्यावर हार्दिक पंड्याने स्वत:ला घेतले एका रुममध्ये कोंडून






