भारत विरुद्ध इंग्लंडचा दुसरा वनडे सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतांना ६ बाद ३३६ धावा केल्या. यात केएल राहुलचे शतक आणि विराट कोहली व रिषभ पंतच्या अर्धशतकांचा समावेश होता.
मात्र याशिवाय अष्टपैलू हार्दिक पंड्याचे योगदान देखील या डावात महत्त्वाचे ठरले. त्याने डावाच्या अखेरीस केलेल्या फटकेबाजीने भारताला ३०० धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र आता हार्दिक पंड्या बाद झाल्यावर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा होत आहे.
५०व्या षटकात झाला बाद
हार्दिक पंड्याने या डावात १६ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी केली. यात ४ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. मात्र भारताची धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात तो ५०व्या षटकांत बाद झाला. रीस टोपलेच्या गोलंदाजीवर तो उंच फटका मारण्याच्या नादात लॉंग ऑफला झेल देऊन बाद झाला.
बाद झाल्यामुळे स्वतःवरच चिडला हार्दिक
मात्र बाद झाल्यानंतर हार्दिक स्वतःवरच चिडल्याचे दिसून आले. तो इतका चिडला होता की बाद होऊन परतत असतांना त्याने बाउंड्री पार केल्यावर डग आऊट मधील बॅट्सवर प्रहार केला. त्याचा राग पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या भारतीय खेळाडूंनी त्यावेळी शांत राहणेच, पसंत केले.
दरम्यान, अशा प्रकारे राग व्यक्त केला असला तरी हार्दिकची खेळी अतिशय उपयुक्त ठरली. त्याच्या खेळीमुळे भारताने इंग्लंड समोर ३३७ धावांचे आव्हान ठेवले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या लक्ष्याचा पाठलाग करतांना इंग्लंडने २६ षटकांत १ बाद १६८ धावांची मजल मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दे घुमा के! दुसऱ्या वनडेत रिषभ पंतचे ७ खणखणीत षटकार, पटाकावलं दुसरं स्थान
लांब केस, पिवळा चष्मा; युवराज सिंगच्या रॉकस्टार लुकवर EX गर्लफ्रेंड फिदा, ‘अशी’ दिली रिऍक्शन
दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार; ‘या’ खेळाडूचे नाव नेतृत्वासाठी आघाडीवर