माउंट मौनगानुई। न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत बुधवारी (१६ मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सामना झाला. या सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाला ४ विकेट्सने पराभूत केले. पण असे असले तरी, भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर हिने एक मोठा विक्रम केला आहे.
हरमनप्रीत कौरचा विक्रम
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र, भारताकडून कोणत्याही फलंदाजाला फारशी खास कामगिरी करता आली नाही. केवळ ४ भारतीय फलंदाजांनी दोन आकडी धावसंख्या पार केली. यात हरमनप्रीत कौरचाही (Harmanpreet Kaur) समावेश होता. पण तिलाही मोठी खेळी करता आली नाही. चांगली सुरुवात केल्यानंतर ती १४ धावांवर बाद झाली.
पण, या १४ धावा केल्याने तिने महिला वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तिने हा विक्रम करताना माजी क्रिकेटपटू अंजूम चोप्रा यांना (Anjum Chopra) मागे टाकले आहे. हरमनप्रीत कौरच्या आता वनडेमध्ये भारताकडून खेळताना ११५ सामन्यांत ३४.९१ च्या सरासरीने २८६३ धावा झाल्या आहेत. तिने अंजून चोप्रा यांच्या वनडेतील २८५६ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
त्यामुळे आता महिला वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अंजूम चोप्रा तिसऱ्या क्रमांकावर घसरल्या आहेत. विशेष म्हणजे बरोबर १० वर्षे अंजूम चोप्रा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायम होत्या. त्यांनी १६ मार्च २०१२ रोजी अखेरचा वनडे सामना खेळला होता. यानंतर आता १० वर्षांनी म्हणजेच १६ मार्च २०२२ रोजी हरमनप्रीतने त्यांचा विक्रम मोडला (Harmanpreet Kaur overtakes Anjum Chopra as second highest Women’s ODI scorer for India).
भारताकडून महिला वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत (Women’s ODI scorer for India) अव्वल क्रमांकावर मिताली राज आहे. विशेष म्हणजे मिताली (Mithali Raj) केवळ भारताकडूनच नाही, तर जागतिक क्रिकेटमध्येही सर्वाधिक वनडे धावा करणारी महिला फलंदाज आहे. तिने २२९ सामन्यांत ५०.७८ च्या सरासरीने ७६६९ धावा केल्या आहेत.
भारताचा पराभव
महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022) इंग्लंडविरुद्ध भारताचा चौथा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३६.२ षटकांत सर्वबाद १३४ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने १३५ धावांचे आव्हान ३१.२ षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.
भारताने या विश्वचषकात आत्तापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहे, तर २ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी आता साखळी फेरीतील उर्वरित तिन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत. भारताला आता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! बायो बबल तोडल्यास खेळाडूवर एका सामन्याची बंदी, आयपीएल २०२२साठी बनली कडक नियमावली
‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटला बालपणीच्या प्रशिक्षकांनी दिला कामाचा सल्ला; म्हणाले, ‘अकादमीत परत ये’
झुलन गोस्वामीने गाठले कपिल देव, क्रिकेटमधील ‘ही’ असाध्य कामगिरी करण्यात महान अष्टपैलूची केली बरोबरी